सचिन वाझेंना पोलीस दलात घेण्याचा निर्णय परमबीर सिंग यांचाच – शरद पवार
नवी दिल्ली – मुंबईतील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरणात चौकशी सुरू असलेल्या सचिन वाझेंना पोलीस दलात घेण्याचा निर्णय परमबीर सिंग यांचाच होता. असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोप हे गंभीर आहेत, असेही ते म्हणाले. त्यांनी आज दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला.
वाचा :-फडणवीस दिल्लीत गेल्यावरच परमबीर सिंग यांचं पत्र समोर आलं- शरद पवार
मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी काल थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केलेत. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित हाऊ लागले आहे. यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. यासर्व प्रकरणी शरद पवार यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.
फडणवीस आले आणि लेटर आलं
यावेळी पवारांनी विरोधी पक्ष आणि परमबीर सिंग यांचं साटंलोटं असल्याचे संकेतही दिले. विरोधी पक्षनेते दिल्लीत आले त्यांनी पत्रकार परिषद घेतली. परमबीर सिंगही दिल्लीत आले. त्यांनी माझ्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्रं दिलं. ते अनेकांच्या संपर्कात असतील. त्यांच्याशी बोलले असतील. त्यानंतरच पत्रं आलं असावं, असंही पवार म्हणाले. मात्र, यावेळी पवारांनी कुणाचंच थेट नाव घेतलं नाही.