भारत-चीन यांच्यात सीमा करार होईपर्यंत सीमेवरील घटना थांबणे कठीण
- लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली |
भारत आणि चीन यांच्यात सीमा करार झाल्याशिवाय या दोन देशांमध्ये सीमेवर होणाऱ्या घटना थांबणार नाहीत, असे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी गुरुवारी सांगितले. अफगाणिस्तानातील ताज्या घडामोडींवर भारतीय लष्कराचे नक्कीच लक्ष असून, त्यातून असलेल्या धोक्याचा अदमास घेऊन त्यानुसार धोरण तयार करणे आम्ही सुरूच ठेवले आहे, असे पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या एका कार्यक्रमात बोलताना लष्करप्रमुख म्हणाले. चीनच्या संदर्भात जनरल नरवणे यांनी सांगितले की, ‘आमच्यातील सीमावाद दीर्घकाळापासून प्रलंबित आहे. कुठल्याही दु:साहसाचा सामना करण्याची आमची तयारी असून, यापूर्वी आम्ही ती दाखवून दिली आहे’.
‘जोवर दीर्घकालीन तोडगा काढला जात नाही, तोवर अशा प्रकारच्या घटना घडतच राहतील आणि असा तोडगा म्हणजे सीमा करार होय. उत्तर (चीन) सीमेवर कायमस्वरूपी शांतता राहावी म्हणून त्या प्रयत्नांवर आम्ही भर द्यायला हवा’, असे मत या संघटनेच्या वार्षिक सत्र परिषदेत बोलताना लष्करप्रमुखांनी व्यक्त केले. भारतीय लष्कर किंवा देशाची सशस्त्र दले अफगाणिस्तानातील घडामोडींमुळे असलेल्या धोक्याचे अधूनमधून मूल्यमापन करत असतात. या मूल्यमापनाच्या आधारे लष्कर भविष्यकालीन धोक्यांना तोंड देण्यासाठी आवश्यक असलेली धोरणे निश्चित करते, असे जनरल नरवणे यांनी अफगाणिस्तानच्या संदर्भात बोलताना सांगितले. ही सतत चालणारी प्रक्रिया असून ती कधीच थांबत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.