विराट कोहलीसोबत खरंच वाद आहे का? रोहित शर्मा म्हणाला, “जोपर्यंत आम्ही खेळतोय…”!
नवी दिल्ली |
भारतीय क्रिकेट संघात फूट पडल्याच्या अनेक चर्चा गेल्या काही काळात रंगल्याचं पाहायला मिळालं. विशेषत: विद्यमान कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांच्यामध्ये वाद सुरू असून कोहलीचं कर्णधारपद गेल्यापासून हा वाद चांगलाच वाढल्याचं देखील बोललं जात आहे. यासंदर्भात विराट कोहली किंवा रोहित शर्मा या दोघांनीही सर्व दावे फेटाळून लावले असले, तरी ज्या पद्धतीने विराट कोहलीचं कर्णधारपद काढून घेतलं, ते पाहाता या दोघांमध्ये वाद असल्याची चर्चा अजूनही सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांनी विचारणा केली असता रोहित शर्मानं आपली नेमकी भूमिका स्पष्ट कली आहे.
विराट-रोहीत वाद आणि चर्चा!
विराट कोहलीनं टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतापर होण्याचा निर्णय जाहीर केल्यापासून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात वाद असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. विराटला एकदिवसीय कर्णधारपदावरून दूर केल्यानंतर रोहित शर्माची त्या ठिकाणी वर्णी लागली आणि या चर्चांना अधिक खतपाणी मिळालं. त्यापाठोपाठ विराट आणि बीसीसीआय यांच्यातील मतभद चव्हाट्यावर आल्यानंतर तर या चर्चांमध्ये तथ्य असल्याचंच लोकांना वाटू लागलं. मात्र खुद्द विराट कोहली आणि रोहीत शर्मा यांनी वारंवार असं काहीही नसल्याचंच स्पष्ट केलं आहे.
ड्रेसिंग रूममधल्या वातावरणावर परिणाम?
दरम्यान, वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवल्यानंतर माध्यमांशी बोलताना रोहीत शर्मानं या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. “आमच्यातल्या वादाविषयी बाहेर सुरू असलेल्या चर्चेचा ड्रेसिंग रूममधल्या वातावरणावर काहीही परिणाम होत नाही”, असं रोहीत शर्मा म्हणाला आहे.
Explained: विराट, रोहित, बीसीसीआय नी कर्णधारपद; काय आहे नेमका वाद?
रोहीतनं स्पष्टच सांगितलं…
“आम्ही जोपर्यंत क्रिकेट खेळत राहणार आहोत, तोपर्यंत आमच्यातल्या वादाविषयीच्या चर्चा बाहेर होतच राहणार आहेत. पण लोकं आमच्याकडे आशेने पाहात आहेत. आमचा खेळ बघत आहेत. एक खेळाडू म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून आम्हाला हे चांगलं माहिती आहे की आम्ही नेमकं कशावर लक्ष केंद्रीत करायला हवं. बाहेरचा गोंगाट ड्रेसिंग रूममधल्या वातावरणावर परिणाम करत नाही”, असं रोहीत शर्मा म्हणाला आहे.