ताज्या घडामोडीमुंबई

‘वाझे लादेन आहे का? असा सवाल करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर भाजपचा हल्लाबोल

मुंबई | प्रतिनिधी

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके भरलेली गाडी उभी करून मनसुख हिरेनच्या हत्या कटात माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्माचा सहभाग असल्याचा आणि त्यासाठी सचिन वाझेने ४५ लाखांची सुपारी प्रदीप शर्माला दिल्याचा आरोप एनआयएने प्रतिज्ञापत्राद्वारे केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता या प्रकरणात मौन सोडावे. वाझे आणि शर्मा यांच्याशी असलेल्या संबंधांचा त्यांनी खुलासा करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी केली.

‘वाझे लादेन आहे का? असा सवाल करत त्याची विधिमंडळात पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता थेट उत्तर दिले पाहिजे. मनसुख हिरेन यांची हत्या करण्यासाठी वाझेने शर्माला ४५ लाखांची सुपारी दिल्याची आणि या कटाची आखणी पोलिस आयुक्तालयात झाल्याची धक्कादायक माहिती एनआयएच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. वाझेप्रमाणेच शर्माही शिवसेनेमध्ये होता. त्याने शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूकही लढवली होती. त्यांचे शिवसेनेच्या अनेक नेत्यांशी घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेशी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी केलेला हा गुन्हा अधिकच गंभीर आहे’, असे उपाध्ये म्हणाले.

वाझेचे निलंबन रद्द करून त्याला पुन्हा सेवेत घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तगादा लावला होता. त्यामुळे या गुन्हेगारांसोबतचे लागेबांधे संशयास्पद आहेत. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट करावी आणि अशा गुन्हेगारी प्रवृत्तीची पाठराखण करून महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणीही उपाध्ये यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button