हे सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना?; अनिल देशमुखांच्या अटकेनंतर भाजपा आमदाराचा सवाल
मुंबई |
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. अनिल देशमुख यांची सोमवारी १३ तास ईडीकडून चौकशी सुरू होती. या चौकशीनंतर अखेर रात्री उशिरा देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अनिल देशमुख टाळाटाळ करत असल्याचा दावा ईडीने केला आहे. त्यांना मंगळवारी येथील न्यायालयात हजर केल्यानंतर ईडी त्यांची कोठडी मागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर भाजपाचे आमदार राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“ईडीच्या अनेक समन्स नंतर आणि न्यायपालिकेने नकार दिल्यामुळे शेवटी माजी गृहमंत्र्यांना ईडीसमोर उपस्थित राहावे लागले. काही महिन्यांपूर्वी अपेक्षित असलेली अटक झाली आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये एका पोलीस विभागामध्ये दर महिन्याला १०० कोटीची वसूली तर पाच वर्षांचा विचार केला तर सहा हजार कोटींची वसूली. महाराष्ट्राचा विचार केला आणि सगळी खाती मोजली किती लाख कोटींची वसूली? हे तीन पक्षांचे सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना आहे. जनतेला कोणत्या स्तरापर्यंत जाऊन लुटायचे याचा कधीतरी हे विचार करणार आहेत का? विषय माजी गृहमंत्र्यांना अटक करुन संपत नाही. त्या गृहमंत्र्यांचे मालक कोण आहेत? तीन पक्षांच्या नेत्यांना या वसूलीचा वाटा मिळत होता का? हे सर्व तुरुंगात जाण्यापर्यंत हे प्रकरण संपणार नाही. महाराष्ट्राला भष्ट्राचार मुक्त करणे ही आमची लढाई आहे, असे राम कदम म्हणाले.
पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर .आता दर महिन्याला 100 कोटी रुपये #वसूली मध्ये त्यांचे प्रमुख बॉस कोण आहेत ? वसूलीचे हिस्सेदार ,वाटेकरी ,कोण कोण नेते आणी पक्ष आहेत ? हे समोर येईल. अन अर्थातच त्या बड्या नेत्यांनाही जेल मध्ये जावे लागेलच. ही लढाई कोणा एका व्यक्ति
— Ram Kadam (@ramkadam) November 2, 2021
माजी गृहमंत्री अनिल देशमुख सोमवारी सकाळी ११:४० च्या सुमारास दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट भागातील ईडी कार्यालयात आपल्या वकील आणि सहकाऱ्यांसह हजर झाले होते. दरम्यान काही वेळ विश्रांती दिल्यानंतर ईडीने त्यांची चौकशी सुरूच ठेवली होती. त्यानंतर रात्री उशिरा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर अटक करण्यात आली. अनिल देशमुखांना अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून यावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. भाजपा आमदार नितेश राणे यांनी खोचक टीका करणारं ट्विट केलं आहे. “अनिल देशमुख हॅपी दिवाली आणि अनिल परब मेरी ख्रिसमस?”, असे ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे. दरम्यान, अनिल देशमुख सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात सोमवारी हजर झाले होते. त्यावेळी त्यांचे वकीलही त्यांच्याबरोबर होते. यावेळी ईडीने त्यांचा जबाब नोंदवला. या प्रकरणी ईडीने देशमुख यांना आतापर्यंत पाच समन्स बजावले होते.