#INDvsENG भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा; इंग्लंडच्या 4 बाद 39 धावा
चेन्नई – भारताने पहिल्या डावात उभारलेल्या ३२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लडची सुरुवात खराब झाली आहे. उपहारापर्यंत इंग्लंडने १८ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात ३९ धावा केल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडचा संघ अद्याप २९० धावांनी पिछाडीवर आहे.
आज दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर अक्षर पटेल लगेच तंबूत परतला. त्यानंतर एकापाठोपाठ एक गडी बाद होत गेले. दुसऱ्या दिवशी २९ धावांत भारताने चार गडी गमावले. तर एका बाजूला ऋषभ पंत विस्फोटक फलंदाजी करत होता. मात्र त्याला एकाही फलंदाजांनी साथ दिली नाही. पहिल्या दिवशी ३३ धावांवर नाबाद असणाऱ्या ऋषभ पंतने दुसऱ्या दिवशी आपले अर्धशतक पूर्ण केले. इंग्लंडकडून फिरकीपटू मोईन अलीने सर्वाधिक चार बळी घेत भारतीय संघाचे कंबरडे मोडले. तर वेगवान गोलंदाज ओली स्टोनने तीन बळी घेत भारतीय संघाला अडचणीत टाकले. याशिवाय जॅक लीच याला दोन, तर कर्णधार जो रुटला एक विकेट मिळाली. त्यानंतर भारतीय संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांपुढे नांगी टाकली आहे. वेगवान गोलंदाज इशांत शर्माने रॉरी बर्न्स याला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले.तर आर. अश्विनने सिब्ली आणि लॉरेन्स यांना बाद करत इंग्लंडला अडचणीत टाकले. अक्षर पटेल याने जो रुटला बाद करत इंग्लंडचे कंबरडे मोडले आहे.