म्यानमारमधील हिंसाचाराचा भारताकडून तीव्र निषेध
नवी दिल्ली |
म्यानमारमधील हिंसाचाराचा भारताने निषेध केला असून सुरक्षा दलांच्या गोळीबारात ठार झालेल्या निदर्शकांबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारताने संयम पाळण्याचे आवाहन केले असून ताब्यात घेण्यात आलेल्या नेत्यांच्या सुटकेची मागणीही केली आहे. म्यानमारच्या लष्कराने गेल्या फेब्रुवारी महिन्यात बंड करून सत्ता काबीज केली व आँग सान स्यू की व अध्यक्ष यू विन माइण्ट यांना ताब्यात घेतले. लष्कराच्या बंडानंतर जोरदार निदर्शने सुरू असून निदर्शकांवर लष्कराने केलेल्या गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाला आहे.
संयुक्त राष्टे्र सुरक्षा परिषदेने बुधवारी म्यानमारमधील स्थितीबाबत चर्चा केली. संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी राजदूत टी. एस. तिरुमूर्ती यांनी गोपनीय बैठकीनंतर ट्वीट केले असून त्यामध्ये हिंसाचाराचा निषेध केला आहे, गोळीबारात ठार झालेल्या निदर्शकांबद्दल शोक व्यक्त केला आहे, अधिक संयम पाळण्याचे आवाहनही त्यांनी केले असून ताब्यात घेण्यात आलेल्या नेत्यांची सुटका करण्यात यावी, असे म्हटले आहे. दरम्यान, म्यानमारमध्ये लष्कराने बंड करून सत्ता काबीज केल्यानंतर सुरू झालेली निदर्शने गुरुवारीही सुरू होती, हिंसाचाराचा धोका झुगारून निदर्शक रस्त्यावर उतरले.