पश्चिम बंगालमध्ये राज्यपालांच्या बैठकीतून भाजपाचे ७४ पैकी २४ आमदार गायब
कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षातील आमदार फोडण्यास भाजपाला चांगलेच यश आले होते. मात्र या सगळ्यावर मात करत तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत आलं. त्यानंतर आता निवडणुकीपूर्वी भाजपासी झालेल्या तृणमूलच्या अनेक आमदारांना पुन्हा घरवापसीचे वेध लागले आहेत. तशी इच्छा अनेकांनी बोलून दाखवली आहे. तर दुसरीकडे घरवापसी रोखण्यासाठी भाजपा पूर्ण प्रयत्न करत आहे. भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांनी नुकतीच राज्यपाल जगदीप धनखर यांची सुवेंदु अधिकारी यांच्यासोबत जाऊन भेट घेतली. मात्र या बैठकीमध्ये भाजपाचे २४ आमदार अनुपस्थित असल्याने राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
पश्चिम बंगाल विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते असणाऱ्या सुवेंदु अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी राजभवनामध्ये पक्षाच्या आमदारांच्या एका प्रतिनिधिमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. पश्चिम बंगालमध्ये सुरू असणाऱ्या अयोग्य घटनांबद्दलची माहिती राज्यपालांना देण्याचा आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्याचा या भेटीचा हेतू होता. मात्र यावेळी भाजपाच्या ७४ पैकी २४ आमदार गैरहजर होते. त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीआधी तृणमूलमधून भाजपामध्ये आलेले नेते पुन्हा घरवापसी करणार का, अशा पद्धतीच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांपैकी काही आमदारांचा गट सुवेंदु अधिकारी यांचे नेतृत्त्व स्वीकारण्यास तयार नसल्याने भाजपामध्ये पक्षांतर्गत दुही असल्याचीही चर्चा आहे.
दरम्यान, तृणमूल सोडणाऱ्या आणि आता पुन्हा पक्षात येऊ पाहणाऱ्या नेत्यांबद्दल पक्षाकडून पुन्हा सकारात्मक विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी आधीच स्पष्ट केले आहे. तर ३० हून अधिक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावाच तृणमूलने केला आहे.