लस पुरवठ्याच्या वादावरून ट्विटरवर #MaharashtraNeedsVaccine ट्रेंडिंगमध्ये
मुंबई – केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला लसीचा अपुरा पुरवठा केला जात असल्याचा दावा वारंवार महाराष्ट्र सरकारकडून केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी महाराष्ट्र सरकारच्या कारभारावर टीका करणारं भलंमोठं पत्रच जारी केलं. त्यानंतर या मुद्द्यावरून नेटिझन्सनी आपली मतं मांडण्यासाठी ट्विटरवर #MaharashtraNeedsVaccine या हॅशटॅगखाली मोठ्या संख्येने ट्वीट्स केले आहेत.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्राला आवश्यकतेप्रमाणे लसींचा पुरवठा केला जात नसल्याचा आरोप केला होता. राज्यातील अनेक सत्ताधारी नेत्यांनी केंद्राकडे अतिरिक्त लसींचा पुरवठा करण्याची मागणी देखील केली. त्यावर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी पत्रातून महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यावरून राज्यात पुन्हा राजकीय वाद पेटला असून गुरुवारी सकाळीच राजेश टोपेंनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. त्यापाठोपाठ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी नेतेमंडळींनी या राजकीय वादामध्ये आपापल्या भूमिका मांडल्या. तर ट्विटरवरदेखील दिवसभर #MaharashtraNeedsVaccine या हॅशटॅगखाली प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला.