महापालिका निवडणुकीत मराठवाड्यातील नागरिकांची ताकद ‘महाविकासआघाडी’च्या पाठीशी उभी करणार- गोविंद घोळवे
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि घोळवे यांच्यात निवडणुकीसंदर्भात खलबते
पिंपरी चिंचवड | पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात मराठवड्यातील लाखो बांधव रोजगारानिमित्त स्थायिक झाले आहेत. मराठवाड्यातील नागरिक शिवसेनेला मानणारे असून सर्वांना एकत्र केले जाईल. दोन महिन्यांनी होणा-या पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत मराठवाड्यातील नागरिकांची ताकद शिवसेना, महाविकासआघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभी केली जाणार असल्याचे मराठवाड्याचे सुपुत्र, शिवसेना राज्यसंघटक, ज्येष्ठ पत्रकार गोविंद घोळवे यांनी सांगितले.बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेना राज्य संघटक गोविंद घोळवे यांच्या निवासस्थानी रविवारी (दि.12) सदिच्छा भेट दिली. क्षीरसागर आणि घोळवे यांच्यात पुण्यात स्थायिक झालेल्या मराठवाड्यातील नागरिकांच्या प्रश्नांसदर्भात सुमारे दीड तास चर्चा झाली. बीड, उस्मानाबाद, लातूर मधील पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झालेल्या सर्वांना एकत्रित आणायचे, अडी-अडचणी सोडविण्याबाबत चर्चा झाली.
गोविंद घोळवे म्हणाले, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक पुढील दोन महिन्यात होणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मराठवाड्यातील लाखो बांधव रोजगारानिमित्त स्थायिक झाले आहेत. बीड, उस्मानाबाद, लातूरमधील नागरिक रोजगारासाठी शहरात आले आहेत. त्यांच्याशी कसा संपर्क साधायचा, प्रत्येक वॉर्डनिहाय प्रत्येकाशी संपर्क साधून जास्तीत-जास्त शिवसेना पक्ष आणि महाविकासआघाडीला मतदान कसे होईल याबाबत सविस्तर चर्चा झाली.महाराष्ट्रमध्ये मराठवाड्यामध्ये शिवसेनेला मानणारा वर्ग सर्वाधिक आहे. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक जास्त मराठवाड्यातील लोक राहत आहेत. त्यांच्यापर्यंत कसे पोहोचायचे, जिल्हा मित्र मंडळ यांचे मेळावा घ्यायचे, तसेच प्रत्येकाला व्यक्तिगत संपर्क साधण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्फत संपर्क अभियान राबविण्याबाबत देखील सविस्तर चर्चा झाल्याचे घोळवे यांनी सांगितले.