किंबहुना वापरलं तर चालेल ना?- राज ठाकरे
मुंबई |
महाराष्ट्रावर दुसऱ्यांदा करोनाचं संकट गडद झालं आहे. सतत वाढत चाललेली रुग्णसंख्या आणि वेगानं होणारं संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी ठाकरे सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. सरकारने निर्बंध लागू केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीतील माहिती दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून सातत्यानं उच्चारल्या जाणाऱ्या किंबहुना शब्दावर मिश्कील प्रश्न केला.राज्य सरकारने कडक निर्बंधांबरोबरच वीकेंड लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना विविध सूचना केल्या.
बैठकीत राज ठाकरे यांनी विविध सूचना केल्या. याची माहिती राज यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेच्या सुरूवातीला बोलताना राज ठाकरे म्हणाले,”काल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी कॉल केला होता. लॉकडाउनच्या संदर्भात मी त्यांना भेटीची विनंती केली होती. त्यांचा मला कॉल आला. त्याच्या आजूबाजूला कोविड पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःला आयसोलेट करून घेतलं आहे. त्यांनी झूमवर बोलता येतील, असं ते म्हणाले. पुन्हा एकदा लॉकडाउन हे लोकांमध्ये पसरलं. रुग्णांची संख्या वाढतीये. किंबहुना…. किंबहुना वापरलं तर चालेल ना?,” असं राज म्हणाले. त्यावर सगळ्यांनी हसून होकार दिला.
काय म्हणाले राज ठाकरे?
“महाराष्ट्रात करोना वाढीची दोन कारण आहेत. महाराष्ट्र औद्योगिक राज्य आहे. त्यामुळे इथे इतर राज्यातून येणारे लोक भरपूर आहेत. हे लोकं दररोज राज्यात येतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण मोजले जात आहेत. तर इतर राज्यात रुग्ण मोजले जात नाहीत. तिथेही अशीच परिस्थिती असणार, पण रुग्ण मोजले तर समोर येईल,” असं राज ठाकरे म्हणाले.
वाचा- टोला लगावल्यानंतरही आनंद महिंद्रांनी मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार; म्हणाले…