घरात बसून कुटुंबातील व्यक्तींना अल्टिमेटम द्यायचा असेल तर द्या; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उडवली खिल्ली
मुंबई |
राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा मुद्दा गाजत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. ‘राज्यात कोणत्याही परिस्थितीत कायदा-सुव्यवस्था अडचणीत येणार नाही, यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे. सर्व धार्मिक स्थळांनी भोंग्यांसाठी परवानगी घ्यावी. सुप्रीम कोर्टाने आवाजाची मर्यादा घालून दिली आहे. ही मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न कोणीही करू नये,’ असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. तसंच यावेळी पवार यांनी आपल्या खास शैलीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा समाचार घेतला आहे.
‘कोणीही अल्टिमेटम देण्याचा प्रश्नच नाही. अल्टिमेटम द्यायला ही काय हुकूमशाही नाही. तुम्हाला अल्टिमेटम द्यायचाच असेल तर घरात बसून कुटुंबातील व्यक्तींना द्या, त्याबाबत आमचं काही म्हणणं नाही. मात्र जाहीरपणे कोणी असे वक्तव्य करत असेल तर नियम सगळ्यांना सारखे आहेत,’ असं म्हणत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे राज ठारे यांना टोला लगावला आहे.
- ‘कायदा हातात घेण्याचं धाडस करू नये’
‘महाराष्ट्रातील जातीय सलोखा राखण्यासाठी कोणाच्याही दबावाला किंवा भावनिक आवाहनाला बळी पडू नये. भोंग्यांना परवानगी घेतली नाही तर कठोर भूमिका घेतली जाईल. ही परवानगी दोन दिवसात मिळणार नाही, याची मलाही कल्पना आहे. मात्र कायदा हातात घेण्याचं धाडस करू नये,’ अशा शब्दांत अजित पवार यांनी ठणकावलं आहे.
दरम्यान, भोंग्यांबाबत एखादा निर्णय घेतला तर तो सर्वच धार्मिक स्थळांसाठी लागू होईल. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये पहाटे मंदिरात काकड आरती सुरू होते. भोंग्यांबाबत निर्णय घेतला तर तो सर्वांसाठीच घ्यावा लागेल, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.