आरक्षणासाठी सरकार ऐकत नसेल तर वेगळा मार्ग- छत्रपती संभाजीराजे
नांदेड |
मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने जरी रद्द केले असले तरी त्यामुळे मराठा समाजामध्ये अस्वस्थता पसरली असून सत्ताधारी व विरोधक आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा एकमेकांना दोष देण्यामध्ये मग्न आहेत. आरक्षणासाठी आगामी काळात लढा देणार असून लवकरच मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेणार आहे. आरक्षण देण्याबाबत सरकार ऐकत नसेल, तर वेगळ्या मार्गाचा अवलंब करावा लागेल, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिला. संभाजीराजे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मराठा समाजाच्या भावना जाणून घेण्यासाठी राज्यभरात आपण दौरा करत आहे. आरक्षण रद्द झाल्यानंतर अन्य समाजाला वेठीस धरत आंदोलन करण्यापेक्षा काही वेगळा पर्याय काढता येतो का? याचा विचार करण्याची गरज आहे. हा पर्याय काढण्याची जबाबदारी राज्य व केंद्र सरकारची आहे, असे ते या वेळी म्हणाले.
आरक्षण रद्द झाले, यात कोणाचे चुकले हे शोधत बसायचे नसून मी कोणाच्या चुका काढण्यासाठी आलो नाही, यामध्ये पर्याय काय काढता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. घटना दुरुस्ती की, पुनर्विचार याचिका या पर्यायावर विचार होणे गरजेचे आहे. मराठा आरक्षणाचा विषय हा कोणत्या राजकीय पक्षाचा, गटाचा नसून तो समाजाचा विषय आहे. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षेनेते देवेन्द्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेणार असून आरक्षणाबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे. या चर्चेनंतर आरक्षणासाठी पुढे काय करायचे याचा निर्णय घेऊ, असे या वेळी संभाजीराजे यांनी सांगितले. दरम्यान, संभाजीराजे यांनी येथे समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि आमदार राम पाटील रातोळीकर यांनीही त्यांची विश्रामस्थळी भेट घेतली.
वाचा- कोरोना बाधितांची माहिती भाजपकडे जाते कशी?, संजोग वाघेरे पाटील यांचा सवाल