“पुन्हा लॉकडाउन केल्यास…,” पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाकरे सरकारसमोर मांडले सहा मुद्दे
मुंबई |
राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा एकदा लॉकडाउन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे राज्यातील जनतेला लॉकडाउनचा इशारा दिला असताना महाविकास आघाडीतून मात्र विरोध होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंबंधी बैठक बोलावली असून रात्री ८.३० वाजता राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. यावेळी राज्यात लॉकडाउन लागणार की नाही हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लॉकडाउन लागल्यास काही बाबी लक्षात घेण्याची सूचना ठाकरे सरकारला केली आहे. “राज्यात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. २०२० मध्ये आढळून आलेल्या रुग्णसंख्येपेक्षा अधिक रुग्ण दरदिवशी राज्यात सापडत आहेत. विदर्भातील अमरावती आणि नागपूरपासून सुरू झालेली कोरोनाची ही दुसरी लाट (?) मुंबई-पुण्यासह, मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागात वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाउन करावे की कसे यावर प्रशासन, वैद्यकीय तज्ञ, उद्योग क्षेत्रातील व्यक्ती आणि सामान्य जनता यांमधून वेगवेगळे मतप्रवाह पुढे येत आहेत. महाराष्ट्रात उद्योजक असो किंवा वैद्यकीय तज्ञ प्रत्येकजण निडरपणे आपले मत मांडू शकतो ही आश्वासक बाब असली तरीदेखील शासनासमोर मात्र गंभीर पेचप्रसंग आहे,” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
परिणामी राज्य पातळीवर लॉकडाउनची अपरिहार्यता निर्माण झाल्यास काही बाबींचा विचार करण्यास पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे.
– लॉकडाउनची अंमलबजावणी करण्याआधी सर्वसामान्य जनतेला पूर्वसूचना देणे.
– लॉकडाउनचा कालावधी कमीत-कमी ठेवणे.
– यादरम्यान बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने रोख रकमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणे (पाश्चिमात्य देशांप्रमाणे). यासाठी प्रसंगी आमदार व खासदार स्थानिक विकास निधीचा वापर करणे.
– खासगी वाहनातून प्रवासास मुभा देणे.
– शेतमाल तसेच इतर औद्योगिक मालाची वाहतूक चालु ठेऊन पुरवठा साखळीवर परिणाम होऊ न देणे.
– लसीकरणाचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढवणे.
If another lockdown is inevitable Govt. must compensate loss of wages by direct cash transfer. If need be MLALAD and MPLAD funds can be diverted. My press release – pic.twitter.com/Kj9RlOAaXX
— Prithviraj Chavan (@prithvrj) March 30, 2021
“केंद्र सरकारने गेली वर्षी मार्चमध्ये अचानकपणे कोणतेही नियोजन न करता लॉकडाउन घोषित केले होते. सारासार विचार न करता घेतलेल्या या निर्णयाचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला व भारतातील ३ कोटींहून अधिक लोक दारिद्र्य रेषेखाली ढकलले गेले. त्यामुळे जनतेला विश्वासात घेऊन अर्थव्यवस्थेचे कमीत-कमी नुकसान होईल आणि करोना संसर्गाची साखळी मोडण्यास मदत ठरेल अशा प्रकारे लॉकडाउनचे नियोजन करणे आवश्यक आहे,” असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.