‘गृहखाते शिवसेनेकडे दिल्यास राष्ट्रवादीचे नेते मातोश्रीवर कॅमेरे लावतील’; चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला चिमटा
कोल्हापूर |
राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वार्थी पक्ष असून तो सत्तेसाठी कोणालाही सोबत घ्यायला तयार असतो, त्यामुळे भूमिका बदलणारा हा पक्ष दगा देणारा आहे असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात मारला. (bjp leader chandrakant patil criticizes ncp and shivsena) पाटील म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष हा महाविकास आघाडीचा रिमोट आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना आपण गृहखाते तुमच्याकडे ठेवा अशी विनंती केली होती, हे खाते दिल्यास राष्ट्रवादीचे नेते मातोश्रीवर कॅमेरे लावतील असा इशाराही दिला होता. पण, मुख्यमंत्र्यांनी हा सल्ला मानला नाही. आता नव्याने सल्ला देण्याची वेळ निघून गेली आहे.
महाविकासआघाडीतील नेत्यांचे मन अतिशय छोटे असल्याचा आरोप करत पाटील म्हणाले, सांगलीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटनास देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिले नाही. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, करोना संकटावेळी त्यांच्याशी चर्चा करून काही निर्णय घेतले असते तर मार्ग निघाला असता. पण आघाडीतील नेते फार छोट्या मनाची असल्यामुळे लोकहिताचे निर्णय झाले नाहीत.
निधी वाटपावरून सरकारमध्ये धुसफूस असल्याचे सांगून ते म्हणाले, अंदाजपत्रकात ५६ टक्के निधी राष्ट्रवादीने घेतला आहे. शिवसेनेला फारच कमी निधी दिला आहे. यामुळे पक्षात नाराजी आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे व्यक्ती म्हणून सज्जन असले तरी गृहमंत्री म्हणून ते या पदाला न्याय देऊ शकणार नाहीत. ते लेचेपेचे नेते आहेत असा टोलाही पाटील यांनी मारला. खासदार संजय राऊत हे मुख्यमंत्री ठाकरे यांचे कमी आणि पवारांचे जास्त आहेत, त्यामुळे ते सातत्याने राष्ट्रवादीला पूरकच बोलत असतात असेही पाटील यांनी सांगितले. कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक भाजप एकतर्फी जिंकेल असा विश्वास व्यक्त करून पाटील म्हणाले, या निवडणुकीच्या प्रचारासाठी विरोधी पक्षनेते फडणवीस, पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, चित्रा वाघ, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेकांच्या सभा होणार आहेत.