तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथे एखादी व्यक्ती मरण पावल्यास त्या मृत व्यक्तीचा अंत्यविधी पोलीस संरक्षणात केला जातो
तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथे एखादी व्यक्ती मरण पावल्यास त्या मृत व्यक्तीचा अंत्यविधी पोलीस संरक्षणात केला जातो. याला कारण ठरले आहे ते येथील स्मशानभूमीचा वाद. काल शनिवारी या गावातील ८० वर्षीय मालू लिंगा दुधभाते यांचा मृत्यु झाला. मात्र, गावाला स्मशानभूमी नसल्यामुळे मालू यांच्या संतप्त नातेवाईकांनी चक्क गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंत्यविधी उरकला. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. ही घटना तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथे घडली आहे. मालू लिंगा दुधभाते यांचा अंत्यविधी शनिवारी ३० जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालय समोर करण्यात आला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथे गावाजवळ असलेल्या हमीद कुरणे यांच्या शेतात २०१६ पूर्वी बांधलेली स्मशानभूमी पाडण्यात आली. तेंव्हापासून हा वाद सुरू आहे. २०१६ पासून गावांमध्ये मृत्यू झाला तर पोलीस संरक्षणात अंत्यविधी होत आहेत. परंतु, शनिवार दिनांक ३० जुलै रोजी गावकऱ्यांनी आम्हाला आमच्या पूर्वीच्या ठिकाणी अंत्यविधी करु दया अशी भूमिका घेतली.
संबंधित शेतकऱ्याच्या शेताच्या मधोमध ही जागा असल्याने व याबाबत कुठलीही नोंद सातबारा उताऱ्यावर नसल्याने शेतकऱ्याने स्वत:ची जागा रस्त्याच्या कडेला दिली होती. परंतु काही लोकांच्या मते ही दिलेली जागा शाळेच्या शेजारी व गावाच्या जवळ असल्याने आम्हाला पूर्वीची जागा मिळावी अशी मागणी केली होती.
दरम्यान, या घटनेनंतर ग्रामस्थामध्ये उलटसुलट चर्चा होत आहे. आता तरी स्मशानभुमीचा वाद मिटेल का ? की भविष्यात अंतविधी ग्रामपंचयतच्या कार्यालयासमोर होतील ?, असे प्रश्न लोक विचारू लागले आहेत.