“नवाब मलिक यांच्यासारखे लोक मी खिशात ठेवतो”, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर धनंजय मुंडे म्हणाले…
मुंबई |
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आर्यन खान प्रकरणानंतर एनसीबीसह भाजपावर सडकून टीका केली. यावर बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्यासारखे लोक मी खिशात ठेवतो, असं वक्तव्य केलं. याच वक्तव्याला आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलंय. चंद्रकांत पाटलांना अशी भाषा शोभत नाही, असं मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं. ते बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. धनंजय मुंडे म्हणाले, “चंद्रकांत पाटलांना अशी भाषा शोभत नाही. चंद्रकांत पाटलांचे खिसे एवढे मोठे नाहीत किंवा भाजपाच्या कुठल्याच राज्य किंवा केंद्रातील नेत्यांचे खिसे मोठे नाहीत. ज्यांनी त्यांनी आपली मर्यादा ठेवून बोलायला पाहिजे.
- “ शाहरूख खानच्या मुलाचा यांना एवढा पुळका का? ”
चंद्रकांतपाटील म्हणाले होते, “मला एक सामान्य नागरिक म्हणून प्रश्न पडला आहे की, एवढा यांना शाहरूख खानच्या मुलाचा पुळका का आला? म्हणजे नवाब मलिक रोज काहीतरी त्यावर म्हणणार, मग महाराष्ट्र सरकार आता काय सर्वोच्च न्यायालयात जाणार. महाराष्ट्रात दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यात महाराष्ट्र सरकार तत्परता दाखवत नाही. शाहरुख खानच्या मुलाला जामीन मिळत नाही, एक बर झालं हायकोर्टावर यांचा संशय नाही. अन्यथा ते म्हणाले असते हायकोर्ट देखील यांनी मॅनेज केलं. पाळंमुळं काढण्यासाठी हायकोर्ट जामीन देत नसेल, तर एवढं तडफडण्याचं काम नाही. हे सर्व बरोबर नाही.”
- नवाब मलिक काय म्हणाले होते?
भाजपाचे मोठमोठे नेते, त्यांच्याजवळचे लोकं एनसीबीच्या कार्यालयात जातात. ते एनसीबी अधिकाऱ्यांना भेटत आहेत. काही भाजपाचे नेते यांचे राईट हँड समीर वानखेडेला भेटत आहेत, हे मी जबाबदारीने सांगतोय. या हालचाली वाढल्या आहेत. पोपट पिंजऱ्यात गेला तर आणखी अनेक गुपितं बाहेर येतील म्हणून जीन असलेले भाजपाचे लोक घाबरायला लागला आहेत. हिवाळी अधिवेशनात मोठमोठे नावं समोर येणार आहेत.” के. पी. गोसावी, भाजपाचा एक नेता, त्याच पत्नी एका खासगी कंपनीत संचालक आहेत. विधानभवनाच्या पटलावर मी हे सर्व ठेवणार आहे, असंही मलिक म्हणाले होते. नवाब मलिक यांच्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पोपट रोज बोलत असल्याची टीका केली.