“मी माझ्या भावासाठी जीवही देऊ शकते”; भाजपाच्या ‘त्या’ आरोपांवर प्रियंका गांधींचं प्रत्युत्तर
नवी दिल्ली |
“मी माझ्या भावासाठी माझा जीव देऊ शकते आणि तो माझ्यासाठी जीव देऊ शकतो,” असे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी आज म्हटलं. भाऊ-बहिणींमध्ये संघर्ष असल्याच्या भाजपाच्या आरोपाला उत्तर देताना प्रियंका गांधी यांनी हे वक्तव्य केले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यात मतभेद सुरू असल्याचं म्हटलं होतं, त्यावर उत्तर देत “आमच्यात मतभेद कुठे आहे”, असा सवाल त्यांनी केला आहे. यावरून प्रियंका गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांना टोला लगावला.
“संघर्ष योगीजींच्या मनात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा यांच्यातील मतभेदांवरून योगी आदित्यनाथ असं बोलत आहे,” अशी टीका त्यांनी केली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या प्रियंका गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं. दरम्यान, रविवारी पंजाबच्या कोटकापुरा येथे ‘नवी सोच नवा पंजाब’ निवडणूक रॅलीला संबोधित करताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी आम आदमी पार्टी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून उदयास आल्याचा दावा केला आहे. रॅलीत प्रियांका गांधी म्हणाल्या, “आम आदमी पार्टी आरएसएसमधून उदयास आली आहे. दिल्लीत शैक्षणिक आणि आरोग्यसेवा संस्थांच्या नावावर काहीही नाही. त्यामुळे राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांबद्दल सत्य जाणून घेणे महत्त्वाचे आहे.”