पतीच्या जीवाला शरद पवार, अजित पवार आणि वळसे-पाटलांकडून धोका – जयश्री पाटील
मुंबई | मुंबईत गावदेवी पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केल्यानंतर आता राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी काल शरद पवार यांच्या घरावर दगडफेक करत आंदोलन केलं. या आंदोलनानंतर गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. या अटकेच्या नंतर आज गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत.
‘मला माझ्या पतीला भेटू देत नाही. त्यांना अतिरेकी असल्यासारखं घरातून घेऊन आले. कोणतीही माहिती न देता त्यांना अटक करण्यात आली. ही शरद पवार यांचं षडयंत्र आहे. ते ताकदीचा चुकीचा वापर करत आहेत. दबाव आणण्यासाठी शरद पवार आणि दिलीप वळसे-पाटील यांनी हे केलं असल्याची गंभीर टीका जयश्री पाटील यांनी केली आहे.
इतकंच नाहीतर ‘माझ्या पतीच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर त्यासाठी शरद पवार, दिलीप वळसे पाटील आणि अजित पवार जबाबदार असतील. या तिघांकडूनही माझ्या पतीच्या जीवाला धोका आहे’ असेही जयश्री पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान त्या पुढे म्हणाल्या की, ‘आम्ही पवार कुटुंबीयांच्या विरोधात भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केल्यामुळे आमच्यावर दबाव टाकण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. मुघलाईसारखं कायद्याला वापरत आहेत. पण शरद पवार हा टेरर चालणार नाही. तुम्ही संविधानापेक्षा मोठे नाही, हे मी आधीच सांगितलं होतं. अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाली तशीच पवारांवर होईल’ असंही जयश्री पाटील म्हणाल्या.