ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अयोध्‍येला जाऊन हिंदूत्‍व सिध्‍द होत नाही, विखे पाटलांचा आदित्य ठाकरेंना टोला

अहमदनगर| मंत्री आदित्‍य ठाकरे यांची मला कीव करावीशी वाटते. ते राजकारणात नवे आहेत. अजून त्‍यांना खूप धडे घेण्याची गरज आहे. कोणी अयोध्‍येला चालले म्हणून मीही जाणार अशी भूमिका घेऊन हिंदूत्‍व सिध्‍द होत नाही, असा टोला भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर भाष्य करताना विखे पाटलांनी ही टीका केली. ‘तुम्‍ही सत्ता टिकविण्‍यासाठी ज्‍या तडजोडी केल्‍या आहेत त्‍यावरुन राज्‍यातील जनता तुम्‍हाला धडा शिकविल्‍याशिवाय राहणार नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्‍या पध्‍दतीने हिंदूत्‍वाचा पुरस्कार केला त्‍याबद्दल लोकांच्‍या मनात आदर होता. त्‍यांनी सत्तेसाठी विचारांची तडजोड केली नाही. परंतू आजची शिवसेनेची परिस्थिती ही सत्तेसाठी तडजोड करणारी आहे. शिवसेनेचे प्रवक्‍ते रोज जी विधानं करीत आहेत ते फक्‍त शिवसेनाप्रमुखांचे विचार संपविण्‍यासाठीच आहेत’, असेही विखे पाटील म्हणाले.

यावेळी विखे पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. ‘मुख्यमंत्र्यांनी मास्क काढून बोलताना १४ तारखेच्या सभेत कोणाचेही मास्क उतरावेत. त्याची चिंता आम्‍हाला नाही. परंतू आता त्यांनी मास्क काढण्याचा निर्णय केलाच असेल तर राज्याच्या प्रलंबित प्रश्नांवर त्यांनी बोलले पाहिजे. मास्क काढण्याचा निर्णय केल्याने मुख्यमंत्री आता जनतेला दिसतील आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलते तरी होतील, अशी अपेक्षा आहे’.

‘राज्यात विजेचा प्रश्न गंभीर होत आहे. गेले सहा महिने एसटी कामगारांचे आंदोलन सुरू होते, शंभराहून अधिक कामगारांनी आत्महत्या केल्या. नियमित कर्जफेड करण्याऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान खात्यात अद्यापही वर्ग नाही, या सर्व प्रश्नांवर त्यांनी आता मास्क काढल्यानंतर बोलावे,’ असे विखे पाटील म्‍हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button