हर हर महादेव ! अब तांडव होगामोहित कंबोज यांनी बुधवारी सकाळी काही नवी ट्विट
मुंबई: राज्यात सत्तापालट झाल्यानंतर भाजप नेते मोहित कंबोज यांचा आत्मविश्वास आता गगनाला भिडताना दिसत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना मोहित कंबोज यांनी तत्कालीन सरकारमधील मंत्र्यांवर आणि नेत्यांवर अनेक गंभीर आरोप केले होते. यापैकी अनेक बडे नेते तुरुंगात गेले होते. त्यानंतर मोहित कंबोज यांनी कालपासून पुन्हा एकदा ट्विटसची मालिका सुरु केली आहे. या माध्यमातून मोहित कंबोज यांनी राज्यातील आणखी एका बड्या नेत्यावर कारवाई होण्याचे संकेत दिले आहेत. कंबोज हे लवकरच पत्रकारपरिषद घेऊन यासंदर्भात माहिती देणार आहेत. मात्र, त्यापूर्वी मोहित कंबोज सोशल मीडियावर जोरदार वातावरणनिर्मिती करताना दिसत आहेत.
मोहित कंबोज यांनी मंगळवारी रात्री केलेल्या ट्विटमध्ये सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. मोहित कंबोज यांच्या या वक्तव्याचा रोख अजित पवार यांच्या दिशेने असल्याचे सांगितले जाते. मोहित कंबोज यांचा आजवरचा लौकिक पाहता त्यांनी भाकीत केलेले बहुतांश नेते तुरुंगात गेले आहेत. त्यामुळे आता कारवाईच्या भीतीने पावसाळी अधिवशेनात अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर जाऊ शकतात, अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.
राज्यातील सत्तांतरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा आली आहे. काँग्रेस आणि शिवसेनेची अवस्था फारशी चांगली नसल्यामुळे या अधिवेशनात विरोधकांची संपूर्ण मदार अजित पवार यांच्यावर अवलंबून आहे. मात्र, अधिवेशनापूर्वीच त्यांच्यावर केंद्रीय यंत्रणांकडून कारवाई होण्याचे संकेत मिळाल्याने पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.मिटकरींची कंबोज यांच्यावर टीका
मोहित कंबोज हा ब्रह्मज्ञान घेतलेला व्यक्ती आहे का. याला कसं माहिती पडतं की ईडी आणि सीबीआय कुठे कारवाई करणार आहे. हा ईडी कार्यालयात पुर्णवेळ बसणारा नेता आहे का, याचीही चौकशी झाली पाहिजे. मोहित कंबोज हा फक्त भाजपचा भोंगा आहे. त्याला दुसरं काहीही जमत नाही. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर चर्चा भरकटवण्याचा त्याचा हा प्रयत्न आहे.