#HappyHoli! का पेटवतात बरं होळी?
मराठी वर्षाच्या सरते शेवटी फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी हुताशनी पौर्णिमा, शिमगा, या नावाने ओळखली जाते. होळीच्या दिवशी होलीका दहन करतात आणि पुरणाचा नैवेद्य दाखवून आणि नारळ फोडून अग्नि देवतेला नमस्कार केला जातो. जसा हा सण आनंदाचा आहे तसाच तो साजरा करण्यामागे काही विशिष्ट हेतू देखील आहे.
शिशीर ऋतुतल्या पानगळीमध्ये शेतात जमलेला पालापोचाळा होळीच्या निमित्ताने शेतकरी जाळून टाकायचे. यामुळे शेतजमीनी अधिक सुपीक व्हायच्या. पारंपारिक होळीत झाडांच्या सुक्या काट्या, गोवऱ्या इत्यादी जाळलं जातात. गोवऱ्या जाळल्यानं हवा शुद्ध होते. त्याचप्रमाणे होळीच्या निमित्ताने कडूनिंब-एरण्ड यांसारखी औषधी झाडांचं लाकूडही जाळलं जायचं. हे जाळण्यामागेही शास्त्रीय कारण आहे. थंडीनंतर सुरु होणार्या उन्हाळ्याच्या ऋतुसंधिकाळामध्ये रोगजंतूचा प्रसार होण्याचा धोका अधिक असतो त्यामुळे रोगजंतूचा नाश करण्यासाठी तसेच या काळात त्रासदायक कीटकांचा नाश करण्यासाठी होळी पेटवली जाते.
पूर्वीप्रमाणे आजही आपण अशी पारंपरिक होळी साजरी करणे आवश्यक आहे. कारण होळीसाठी सर्रास झाडांची कत्तल करणे, तसेच होळीत प्लॅस्टिक, टायर जाळणे हे पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक आहे त्यामुळे हवा शुद्ध होण्याऐवजी ती अधिक दूषित होत जाते.