मामांकडे राहायला आला होता; अल्पवयीन मुलाचा खदानीत बुडून मृत्यू, मित्रांनी पाहिले आणि…
जळगाव | जळगाव जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये नदीपात्रातील पाण्यात बुडून दोघा जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना आज शनिवारी समोर आल्या आहेत. मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या एका अल्पवयीन मुलाचा खदानीच्या पाण्यात तर बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीचा वाकी नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल आहे.
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथिल रहिवासी असलेला सुमित योगेश न्हावी (वय १४) हा शिक्षणासाठी जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील मामाकडे राहण्यास आला होता. दरम्यान, काल शुक्रवारी दुपारी सुमित काही मित्रांसोबत उजाड कुसुंबा भागात एका खदानीत पोहोण्यासाठी गेला होता. यावेळी गाळात अडकल्यामुळे तो पाण्यात बुडाला. ही घटना पाहून त्याच्यासोबत असलेले मित्र भांबावले. ते सर्व घरी निघुन आले. घरी परतल्यानंतर त्यांनी ही घटना कुणालाही सांगितली नाही. सुमितचे कुटुंबीय रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेत राहिले. या प्रकरणी त्याचे मामा अशोक सुभाष सोनवणे यांनी शनिवारी सकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात हरविल्याबाबत तक्रार दिली.
शोध घेत असतांना आज शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास काही लोकांना खदानीजवळ सुमितचे कपडे आढळुन आले त्यानंतर खळबळ उडाली. त्यानंतर सुमित पाण्यात बुडाल्याची माहिती समोर आली. यांनतर पोलिस पाटील राधेश्याम चौधरी व मामा अशोक सोनवणे यांनी पाण्यात शोध घेतला असता सुमीतचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवला. या संदर्भात कुटुंबीयांची तक्रार नसल्यामुळे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत सुमित हा कुसुंबा गावात आई व लहान भाऊ राज यांच्या सोबत राहत होता. त्याची आई चटई कंपनीत कामाला जाते. या घटनेमुळे कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
नदीपात्रात प्रौढाचा मृत्यू
शहरातील हरिविठ्ठल नगरात राहणारे शरद मोतीलाल तायडे (वय५८) बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिपाई म्हणून नोकरीस होते. दि. १० जुलै रोजी ते नाशिक येथे आपल्या मुलाकडे गेले होते. त्यानंतर ते दि. १२ रोजी ते नाशिकहून जळगावला परत यायला निघाले. मात्र, ते जळगावला न पोहचता ते नशिराबाद येथे पोहचले. त्याठिकाणाहून त्यांनी मुलगा भावेशला फोन करुन आपण नशिराबाद येथे पोहचल्याचे सांगितले.
त्यानंतर दोन दिवसांपासून त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने मुलाने त्यांचा शोध सुरु केला. अखेर भावेश तायडे यांनी नशिराबाद पोलिसात वडील हरविल्याची तक्रार दिली. दरम्यान, आज सकाळी नशिराबाद स्मशानभूमीजवळील वाकी नदीपात्रालगत असलेल्या विटभट्टीवरील मजूरांना नदीपात्रात मृतदेह तरंगतांना दिसून आला. तायडे यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.