चौका चौकात उभारल्या गुढ्या; नारायण राणेंच्या स्वागतासाठी कणकवली शहर सजले
रत्नागिरी – शिवसेना आणि भाजप यांच्यातील राड्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या स्वागतासाठी कणकवली शहर सज्ज झाले आहे. चौका चौकात गुढ्या उभारल्या असून शहरभर आकाश कंदीलही लावण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यांना काल अटकही करण्यात आली. यावरून राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने ठाकले होते. आता जामीन मिळाल्यानंतर मध्यरात्री त्यांनी महाडवरुन मुंबईकडे प्रयाण केलं. दोन दिवस आराम करुन ते पुन्हा जनआशीर्वाद यात्रा सुरु करणार आहेत.
नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी कणकवली सज्ज झालेली आहे. कणकवली हा राणे परिवाराचा बालेकिल्ला आहे. कणकवलीत राणेंच्या होणाऱ्या स्वागताची सर्वांना उत्सुकता आहे. शहरभर यात्रेच्या स्वागताचे आधीच फलक लागले आहेत. रात्री राणेंना जामीन मंजूर झाल्यानंतर मध्यरात्री शहरात गुढ्या उभारण्यात आल्या आहेत. शहरात पटवर्धन चौकात रस्त्याच्या बाजूला रात्री गुढ्या उभ्या केल्या गेल्या. मुख्य चौकात आकाशकंदील लावले गेलेत. एकंदरितच कणकवलीतील राणेंचं स्वागत जंगी होणार आणि राणेसमर्थक जोरदार शक्तीप्रदर्शन करणार हे नक्की…!