breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

सामूहिक राष्ट्रगीत गायन: उद्या ११ वाजता जिथे असाल तिथे उभं राहायचं!

मुंबई : संपूर्ण देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दणक्यात साजरा होत असताना केंद्र शासनाच्या आजादी का अमृत महोत्सवच्या धर्तीवर राज्य सरकारने उद्या संपूर्ण राज्यभरात सामूहिक राष्ट्रगीत गायनच्या उपक्रमाची घोषणा केली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य शासनाने तसा अध्यादेश काढला आहे. त्यानुसार सकाळी ११:०० ते ११:०१ या कालावधीत नियोजित सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात नागरिकांनी नेमके कोणते नियम पाळायचे आहेत, याबद्दल सरकारने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होऊन एक विक्रम प्रस्थापित करावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात सध्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत वेगवेगळे अभिनव उपक्रम संपन्न होत आहेत. राज्यातही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन सुरू असून, या महोत्सवाअंतर्गतच, ‘सामूहिक राष्ट्रगीत गायन’ ही अभिनव संकल्पना पुढे आलेली आहे. राज्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहात या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

शिंदे सरकारच्या गाईडलाईन्स

‘स्वराज्य महोत्सव’ अंतर्गत ‘समुह राष्ट्रगीत गायन’ या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीच्या अनुषंगाने सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयांना खालीलप्रमाणे सर्वसाधारण सूचना देण्यात येत आहेत.

१. दिनांक १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० वाजता एकाच वेळी राज्यात सर्वत्र समूह राष्ट्रगीत गायन होईल, याची दक्षता घेण्यात यावी.
२. या राष्ट्रगीत गायनासाठी राज्यातील खाजगी, शासकीय तसेच इतर सर्व प्रकारच्या शाळा / महाविद्यालये / शैक्षणिक संस्था/ विद्यापीठे यामधील विद्यार्थी, शिक्षक यांचा सहभाग अनिवार्य असेल.
३. सकाळी ठीक ११:०० वाजता समूह राष्ट्रगीताला सुरुवात होईल व सकाळी ११:०० ते ११:०१ या एका मिनिटांमध्ये राष्ट्रगीत गायन करणे अपेक्षित आहे, याची सर्व संबधितांनी दक्षता घ्यावी.
४. समूह राष्ट्रगीत गायनाच्या वेळी जाणते अजाणतेपणे राष्ट्रगीताचा अवमान होऊ नये, याची दक्षता घेण्याबाबत नागरिकांमध्ये सर्व स्तरावर जाणीव जागृती निर्माण करण्याची सर्व संबंधितांनी विशेष काळजी घ्यावी.
५. सर्व संबंधित यंत्रणांनी राज्यातील सर्व नागरिकांना दिनांक १७ ऑगस्ट रोजी, सकाळी ११.०० वाजता आहे त्या ठिकाणी थांबून राष्ट्रगीत गायन करण्याचे आवाहन करण्यात यावे.
६. खाजगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था, शासकीय व निम शासकीय कार्यालये, केंद्र शासन व राज्य शासनाशी संबंधित कार्यालयातील अधिकारी/ कर्मचारी यांनीही या उपक्रमात सक्रीय सहभाग घेणे आवश्यक राहील, याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी.
७. शाळा / महाविद्यालय / शैक्षणिक संस्था / विद्यापीठे येथे या उपक्रमाबाबत सर्व विद्यार्थ्यांना अगोदरच विस्तृत माहिती देण्यात यावी. सर्व सरकारी / खाजगी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था / शासकीय व निम शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना सदर उपक्रमात सहभागी होणे अनिवार्य राहील.
८. राष्ट्रगीत गायनासाठी विद्यार्थ्यांनी मोकळे पटांगण, वर्ग खोली, किंवा हॉल या ठिकाणी एकत्रित उपस्थित राहावे, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग होणे आवश्यक राहील, यासाठी शालेय शिक्षण विभाग व उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून सर्व संबंधितांना निर्देश द्यावेत.
९. ग्राम स्तरावर, वॉर्ड स्तरावर (नगरपालिका/ नगरपरिषद/ नगरपंचायत/ महानगरपालिका स्तरावर), सर्व प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, यासाठी ग्राम विकास व पंचायत राज विभाग व नगर विकास विभाग यांनी सर्व संबंधितांना निर्देश द्यावेत.
१०. जिल्हाधिकारी यांनी या उपक्रमासाठी जिल्ह्याचे संनियंत्रण करावे, तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय, सहकारी तसेच खाजगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था यांना जिल्हाधिकारी स्तरावरून या उपक्रमाबाबत अवगत करून समूह राष्ट्रगीत गायनासाठी जाहीर आवाहन करावे. तसेच तालुकास्तरावर तहसीलदार यांनी या उपक्रमाचे संनियंत्रण करावे.
११. या कार्यक्रमाच्या जाणीव जागृती आणि प्रचार व प्रसिद्धीसाठी मोठ्या प्रमाणात मुद्रित साधने, समाज माध्यमे, खाजगी वाहिन्या, रेडिओ, एफ एम रेडिओ, कम्युनिटी रेडिओ इत्यादी माध्यमांचा वापर करावा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button