औरंगाबादकरांसाठी मोठा दिलासा! शहराच्या पाणी पुरवठ्यात झाली मोठी वाढ
औरंगाबाद: औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठ्यात ११ दशलक्ष लिटर्सने वाढ झाली आहे. महानगरपालिका, जीवन प्राधिकरण तसेच एमआयडीसीने केलेल्या प्रयत्नांमुळे नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबाद येथील पाणी प्रश्नाचा आढावा घेतला. या आढाव्यात शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या औरंगाबाद शहरासाठी हर्सूल, जायकवाडी, फारोळा तसेच एमआयडीसीने वाढवून दिलेल्या ३ एमएलडी पाण्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय हाती घेतलेल्या विविध ४२ प्रकाराच्या कामांमुळे पाणी पुरवठ्याच्या सध्याच्या कालावधीत आणखी सुधारणा होईल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.
औरंगाबाद शहरामधील नागरिकांना ३ ते ४ दिवसांनी पाणी मिळण्याचे नियोजन केले जात आहे, अशी माहिती पालकमंत्री देसाई यांनी म्हटले आहे. औरंगाबादकरांना नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली जाईल, असा विश्वास यावेळी देसाई यांनी व्यक्त केला. दरम्यान, शहराला ११ दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्र्यांनी महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे तसेच जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.