विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या आवाजी मतदानाला राज्यपालांचा विरोध; ठाकरे सरकारला दणका
मुंबई | प्रतिनिधी
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या आवाजी मतदान प्रक्रियेला राज्यपाल भगत सिंह कोश्यारींनी विरोध केला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला मोठा धक्का बसला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरायचा आहे. मात्र राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्य सरकारपुढे नवा पेच निर्माण झाला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या प्रक्रियेला विरोध केल्याने अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळणार असंच चित्र आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वतीने बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांनी राज्यपालांना निवडणुकीच्या संदर्भात पत्र सादर करून निवडणूक घेण्याची संमती दिली होती. आज त्यावर राज्यपालांनी सरकारला पत्र लिहून उत्तर दिलं आहे.
राज्यपालांनी काय म्हटलं आहे?
महाराष्ट्र सरकारने केलेली विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची मागणी केली होती. यासाठी त्यांनी नियम बदलला आणि गुप्त मतदान प्रक्रियेच्या ऐवजी आवाजी मतदान असा बदल केला. मात्र राज्यपालांनी ही आवाजी मतदानाची मागणी फेटाळून लावली आहे. निवडणूक प्रक्रियेत करण्यात आलेला बदल असंवैधानिक आहे. असं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी वेगवेगळी प्रक्रिया कशी काय असू शकते? असंही राज्यपालांनी म्हटलं आहे.
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. त्याला आता एक वर्ष झालं आहे. हिवाळी अधिवेशनात तरी अध्यक्ष निवडला जावा अशी मागणी राज्यपालांनी केली होती. मात्र आता त्यांनी आवाजी मतदान प्रक्रियेला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे विधासभा अध्यक्ष निवडणुकीचा पेच राज्य सरकारपुढे निर्माण झाला आहे.