राज्यातील १४ हजार शाळा बंद करण्याचा घाट
मुंबई : विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याचे कारण देऊन राज्यातील १४ हजार शाळा बंद करण्याचा घाट शिंदे-फडणवीस सरकारने घातला असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. बहुजन समाजातील गरीब, कष्टकरी, शेतकरी वर्गातील मुलांना पुन्हा शिक्षणापासून वंचित ठेवण्याची ही मनुवादी प्रवृत्ती आहे, अशी टीका त्यांनी केली.
या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिवलेल्या पत्रात पटोले यांनी म्हटले आहे की, राज्यातील १४ हजार शाळा कमी पटसंख्येच्या नावाखाली बंद करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे समजते. कमी पटसंख्येच्या शाळा या दुर्गम, अतिदुर्गम, ग्रामीण भाग, आदिवासी पाडे या भागांत आहेत. जिल्हा परिषदांच्या शाळांमधून शेतकरी, कष्टकरी, गरीब व सामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेत असतात. गाव-खेडय़ातील या शाळा बंद केल्या तर ही मुले शिक्षणापासून वंचित राहतील, काँग्रेस पक्ष हे कदापि मान्य करणार नाही.
संसदेत २००९ मध्ये शिक्षणाचा अधिकार कायदा मंजूर करण्यात आला . या कायद्याने ६ ते १४ वर्षांच्या प्रत्येक बालकास जवळच्या शाळेत प्रवेशासोबत मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद केली आहे. खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी २५ टक्के आरक्षणही लागू आहे. परंतु आता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने जिल्हा परिषद शाळेतील? पटसंख्या शून्य ते २० पर्यंत असलेल्या शाळा? बंद करण्याचा घाट घातला आहे. यामुळे आदिवासी पाडे आणि दुर्गम भागातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
गुजरातमधील भाजप सरकारने ६ हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आणि महाराष्ट्रात १४ हजार शाळा बंद करण्याचा घाट घातला जात आहे. गोरगरिबांना शिक्षण मिळू नये हे भाजपचे धोरण आहे. ही मनुवादी वृत्ती असून बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा डाव आम्ही हाणून पाडू, असा इशारा पटोले यांनी दिला आहे.