नायगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अजित पवारांचं आश्वासन
पुणे |
देशातील स्त्रीशक्ती आज सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून योगदान देताना, स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहे. त्याचे श्रेय खऱ्या अर्थाने क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी त्याकाळात स्री शिक्षणासाठी घेतलेले कष्ट व सहन केलेल्या हालअपेष्टांना जाते असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या नायगाव (ता.खंडाळा) या जन्मगावी सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास उपमुख्यमंत्र्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. “महिला शिक्षण दिना’च्या शुभेच्छाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
नायगावच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे आश्वासन देत पवार पुढे म्हणाले, क्रांतीज्योती सावित्रीबाई देशातील स्त्रीशिक्षणाच्या जननी आहेत. त्यांनी महिलांवरील अन्यायाविरुद्ध लढा दिला. स्त्रीसक्षमीकरणासाठी मोठे योगदान दिले. त्या सत्यशोधक विचारांच्या क्रांतिकारी समाजसुधारक होत्या. देश व देशातील स्त्रीशक्ती क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या सदैव ऋणात राहील.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांना त्यांच्या प्रत्येक कार्यात सावित्रीबाईंनी समर्थपणे साथ दिली. देशात स्त्रियांची पहिली शाळा महात्मा फुले यांनी सुरु केली आणि त्या शाळेत पहिली स्त्री शिक्षिका होण्याची जबाबदारी सावित्रीबाईंनी उचलली. स्त्रियांच्या शिक्षणासाठी या दोघांनी केलेलं कार्य व घेतलेले कष्ट सदैव स्मरणात राहतील. नायगाव येथे आयोजित कार्यक्रमाला राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण,पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, नायगावच्या सरपंच पूनम नेवसे आदी उपस्थित होते.