राष्ट्रवादीच्या पाच नेत्यांची चौकशी होणार, रणजितसिंह निंबाळकरांचे खळबळजनक विधान
– भाजपाचे मोहित कुंभोज यांच्या आरोपानंतर नवा आरोप
– ‘ते’ बडे नेते कोण? राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी।
भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. असे असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात अद्याप पूर्णपणे क्लीन चिट मिळाली नसून २०१९ मध्ये एसीबीने दिलेल्या क्लीन चिटबाबतचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाने अद्याप स्वीकारला नसल्याचे समोर आले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते रणजितसिंह निंबाळकर यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीच्या ५ नेत्यांची चौकशी करावी अशी माझी मागणी आहे. लवकरच त्यांची नावे देशपातळीवर कळवणार आहोत.
“राष्ट्रवादीतील दहा नेत्यांपैकी ५ नेत्यांची चौकशी केली जावी. त्यांची नावे आम्ही देशपातळीवर कळवणार आहोत. या पाच लोकांच्या फायली आलेल्या आहेत. यातील काही आमदार, मंत्री होते. यासाठी ईडी, सीबीआयच्या हस्तक्षेपाची गरज आहे. लवकरच आम्ही हे केंद्र सरकारला कळवणार आहोत,” असे विधान रणजितसिंह निंबाळकर यांनी केले आहे. भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या आरोपांवरदेखील निंबाळकर यांनी भाष्य केले आहे. “राष्ट्रवादी पक्षात अनेक चोर आहेत. यातील कोणता चोर नेता मोहित कंबोज यांना सापडला आहे, हे त्यांना विचारल्यावरच समजेल. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप निश्चितपणे झालेले आहेत. यामध्ये कोणाचेही दुमत नाहीये. चौकशी केली तर योग्य ते समोर येईल,” असे निंबाळकर म्हणाले.