नारायण राणे यांच्यावर कारवाई करणार नाही; राज्य सरकारची हायकोर्टात माहिती
मुंबई |
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर कारवाई करणार नाही, अशी माहिती राज्य सरकारने आज मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दिली. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना अपशब्द काढले होते. याचप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी राणेंवर कारवाई करणार नसल्याची माहिती राज्य सरकारकडून दिली गेली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना अपशब्द काढले होते. यावरुन त्यांना अटकही करण्यात आली होती. राणेंच्या अटकेवरुन राज्याचं राजकारण तापलं होतं. राणेंच्या अटकेला आता ८ महिने उलटून गेले आहेत. आज याचप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. राणेंनी मुख्यमंत्र्यांविषयी अपशब्द वापरल्याचं हे प्रकरण आहे. सुनावणीदरम्यान, नारायण राणे यांच्यावर कारवाई करणार नसल्याची माहिती राज्य सरकारकडून न्यायालयात दिली गेली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लगावण्याची भाषा नारायण राणे यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याच्या कारणावरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. संगमेश्वर पोलिसांनी त्यांना अटकही केली होती.
नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते?
ऑगस्ट महिन्यात भाजपची जन आशीर्वाद यात्रा सुरु होती. रायगड महाडमध्ये माध्यमांशी संवाद साधताना राणेंनी मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री स्वातंत्र्याचं अमृत महोत्सव असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी चुकून ‘हिरक महोत्सव’ शब्द वापरला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. याच सगळ्या प्रकरणावरुन राणेंनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करताना म्हटलं, “मी तिथे असतो तर मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावली असती”