ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

जलयुक्त शिवार योजनेत घोटाळा वनपालावर गुन्हा दाखल

औरंगाबाद | भाजप सरकारची महत्वाची आणि माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची महत्वकांशी योजना समजली जाणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेत औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सलग चर खोदण्याचे काम केल्याची बनावट देयके दाखल करून, वनपाल तथा वन व्यवस्थापन समितीच्या सचिवाने अपहार केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश राधाकिसन पचलोरे, असं गुन्हा नोंद झालेल्या वनपालाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वन विभागाच्या वतीने औरंगाबादच्या अंजनडोह येथे १८ सप्टेंबर २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत सलग चर खोदण्याची कामे करण्यात आल्याचे दाखवून निधी खर्चला गेला. तेव्हा गणेश पचलोरे हा अंजनडोह येथे वनपाल तथा संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा सचिव म्हणून कार्यरत होता. त्याने अंजनडोह येथे २०१६-१७ या कालावधीत चर खोदल्याचे दाखवून बनावट व्हाचर तयार केले. त्यानंतर ही व्हाचर खरे असल्याचे भासवून त्याने बँकेतून २ लाख ४७ हजार ३४४ रुपये काढून अपहार केल्याचे चौकशीत समोर आले.

असा आला प्रकार समोर

फडणवीसांची महत्वकांशी योजना समजल्या जाणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे प्रकरण समोर आले होते. याप्रकरणी अनेकांवर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले होते. त्यानंतर जलयुक्त शिवार योजनेतील सर्वच कामांची चौकशी करण्याची मागणी महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांनी केली होती. त्यानुसार शासनाच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या कामांची चौकशी केली जात आहे. दरम्यान, चौकशी करत असताना एसीबीचे उपअधीक्षक रूपचंद मधुकर वाघमारे यांच्या तपासात वरील अपहार झाल्याचे समोर आले. त्यामुळे याप्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button