संजय राऊत, गुलाबराव पाटील यांच्यावरही गुन्हे दाखल करा: चित्रा वाघ
बीड | प्रतिनिधी
शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेना मंत्री गुलाबराव पाटलांवर महिलांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा. अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. ‘मूठभर महिलांची इज्जत ही इज्जत आणि बाकीच्या महिला कचरा हे महाराष्ट्रात चालणार नाही. राज्यातल्या प्रत्येक महिलेची डिग्निटी त्याठिकाणी जपली गेली पाहिजे. याच्यासाठी सरकारने कडक पावले उचलली पाहिजेत.’ असं म्हणत चित्रा वाघ यांनी शिवसेना नेत्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
‘आजच मी राज्याच्या सन्माननीय गृहमंत्र्यांना पत्र दिलं आहे. जर एका माणसाने एका महिलेची केलेली बदनामी ही बदनामी होत असेल, तर सत्ताधारी पक्षातील नेत्याने महिलांवर केलेली बदनामी, त्यांचं चुकीचं बोलणं हे आक्षेपार्ह आणि आपत्तीजनक कसं असू शकणार नाही?’
‘कानून सब के लिए एक है, तो शिक्षा भी सब के लिए एक होनी चाहिये.. म्हणूनच शिवसेनेचे खासदार संजय राऊत शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा.’ अशी मागणी केल्याचं चित्रा वाघ यांनी सांगितलं आहे. त्या बीडमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, ‘आम्ही भाजपच्या लोकांचं समर्थन करत नाही, त्याच्यावर कारवाई केली ते योग्यच केली. मग गुलाबराव पाटीलांनी देशाच्या खासदार हेमा मालिनी यांच्याविषयी वक्तव्य केलं ते आपत्तीजनक नव्हतं? ते विनयभंगामध्ये बसत नाही का?’
‘शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सर्वज्ञानी, यांनी सगळ्या प्रसिद्धी माध्यमांसमोर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना शिव्या दिल्या, त्या शिव्या घराघरांत पोहोचल्या, ते आपत्तीजनक नाही का? त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. ही मागणी आम्ही केली आहे.’ असंही चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.
चित्रा वाघ यांनी केलेल्या या मागणीमुळे पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या राज्यामध्ये भाजपचे अनेक नेते शिवसेनविरुद्ध आक्रमक भूमिका घेत आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षातील नेते हे सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. त्यातच आता मुंबई महापालिका निवडणूक देखील तोंडावर आलेली आहे. अशावेळी दोन्ही बाजूने आता टीकेची धार अधिक तीव्र होत चालली आहे.