#FarmersProtest: अखेर शरद पवार यांनी केली ‘ही’ विनंती
नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी अडून बसले आहेत, तर दुसरीकडे सरकार देखील एक पाऊल मागे घेत नाही. दिल्लीत देखील या कायद्यांना विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी केंद्र सरकावर हल्लाबोल करत सरकारला सल्ला दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीही केंद्रीय कृषी कायद्यांबाबत केंद्र सरकारने पुनर्विचार करावा अशी मागणी केली आहे.
शरद पवार म्हणाले की, केंद्र सरकारने कृषी कायद्यांबाबत पुनर्विचार केला पाहिजे. हे कायदे चर्चा न करता मंजूर करण्यात आले होते. या कायद्यांवर चर्चा करा असे सर्वांनी म्हटले होते. मात्र विरोध पक्षांचे म्हणणे बाजूला सारत केंद्र सरकारने घाईघाईत हे कायदे पारीत केले.
केंद्र सरकार आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्याच्या मनस्थितीत नाही असा विचार करणे गैर आहे. याच कारणामुळे हे आंदोलन असेत पुढे सुरू राहील. सध्या हे आंदोलन दिल्लीच्या सीमेपर्यंत मर्यादित आहे. जर योग्य वेळी निर्णय घेतला गेला नाही, तर हे आंदोलन इतर ठिकाणीही पसरेल. यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या धैर्याची परीक्षा घेऊ नये, अशी विनंती आपण केंद्र सरकारला करत असल्याचे पवार म्हणाले.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा सोळावा दिवस आहे. आपल्या मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर पाय रोवून उभे आहेत. सरकारचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. आज पुन्हा एकदा केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकऱ्यांना आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले आहे.