शेतात काम करताना उष्माघातामुळे शेतकऱ्याचा मृत्यू…
परभणी : सध्या राज्यात प्रचंड प्रमाणात उन्हाचा कडाका जाणवतोय त्यामुळे उष्माघाताने अनेकांचा बळी जात आहे. अशातच आता, शेतामध्ये काम करत असताना एका वयोवृद्ध शेतकऱ्याला अचानक चक्कर आल्याने खाली कोसळून उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. सदर घटना परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा येथे घडली आहे. दत्ता जाधव असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मागील काही दिवसापासून परभणी जिल्ह्यामध्ये तापमानात वाढ झाली आहे. उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे लहान बालकांसह वयोवृद्धांना याचा त्रास होत आहे.
अशातच सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा येथील दत्ता जाधव वय (८२) शेतामध्ये मशागतीचे काम करत असताना त्यांना अचानक चक्कर आले. त्यामुळे शेतकरी दत्ता जाधव खाली कोसळले त्यामुळे जाधव यांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी शनिवारी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान शेतकरी दत्ता जाधव यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. दरम्यान, परभणी जिल्ह्यामध्ये उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे. या अगोदर उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांनी विनाकारण दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.