देशात अतिवृष्टीमुळे महापुराचा हाहाकार; १३१ लोकांचा मृत्यू
नवी दिल्ली : मान्सूनने आता सर्वत्र हजेरी लावल्यामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये (North East States Floods) अतिवृष्टीमुळे झाल्याने अनेक गावांत पूर आला तर काही ठिकाणी भूस्खलनात आतापर्यंत तब्बल १३१ जणांचा मृत्यू झाला आहे. तुफान पावसामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांचे हाल होत आहेत.
आस्मानी संकटामुळे आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना पूर्ण मदत करण्याचं आश्वासन दिलं असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी सांगितलं की, नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक आसाम आणि मेघालयातील पूरग्रस्त भागात पाठवले जाईल. केंद्र या भागातील लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) ने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी राज्यात ११ मृत्यूची नोंद झाली, त्यापैकी आठ मृत्यू ३२ पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये झाले आहेत. तर इतर पाच जिल्ह्यांत दोन मुलांसह लोक बेपत्ता आहेत.
सरासरीपेक्षा जास्त पाऊस
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी मे आणि जूनमध्ये पाऊस सरासरीपेक्षा जास्त असल्याचं एएसडीएमएनं म्हटलं आहे. भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आलेल्या माहितीनुसार, १६ जून रोजी मेघालयात गेल्या एका आठवड्यात सामान्यपेक्षा १७२ टक्के जास्त पाऊस झाला. आसाममध्ये १०० टक्के जास्त आणि अरुणाचल प्रदेशात सरासरीपेक्षा २८ टक्के जास्त पाऊस झाला आहे. आसाममधील ३६ पैकी ३२ जिल्ह्यांमध्ये ४७,७२,१४० लोकांना पुराचा फटका बसला आहे. ASDMA च्या बुलेटिननुसार, आणखी ११ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या ८२ वर पोहोचली.