अजित पवार, अशोक चव्हाणांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; शालिनीताई पाटील यांची राज्यपालांकडे मागणी!
वाई |
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून आणि राज्य सहकारी बँकेच्या सत्तेचा अधिकाराचा वापर करून बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांच्या मालकीचा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना कवडीमोल भावाने गिळंकृत केला आहे. यामुळे अजित पवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी कारखान्याच्या संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संस्थापक अध्यक्षा माजी आमदार, डॉ. शालिनीताई पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची त्याच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी जरंडेश्वर साखर कारखानाप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेचा दुरूपयोग करून कारखान्याचा बेकायदेशीर लिलावात विकत घेऊन ऊस उत्पादक सभासदांचा विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे.
डॉ. शालिनीताई पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना निवेदन दिले आहे. “मंत्रीपदाचा आणि राज्य सहकारी बँकेच्या सत्तेचा गैरवापर करून अजित पवार आणि अशोक चव्हाण यासारख्या अनेक मंत्र्यांनी राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावाने घेतले. त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा काहीही अधिकार नाही. हजारो शेतकरी सभासदांची त्यांनी फसवणूक केलीय. अजित पवार यांनी सत्तेचा दुरुपयोग करून जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना कमी किमतीत बेकायदेशीर लिलावात विकत घेऊन कोरेगाव-खटाव तालुक्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वासघात केला.”, असे डॉ. शालिनीताई पाटील म्हणाल्या.
“उच्च न्यायालयाने अजित पवार यांची फसवणूक उघडकीस आणली आणि साखर कारखान्याच्या विद्यमान खासगी संचालकांच्यावर गुन्हे दाखल केले. आज ईडीने साखर कारखाना जप्त केला आहे. कायदेशीर कारवाई व चौकशी ईडीच्या माध्यमातून सुरु आहे. कमी किमतीत सहकारी साखर कारखाने गिळंकृत करणाऱ्या अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदावर राहण्याचा काहीही अधिकार नाही. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची शिफारस राज्यपालांनी राज्य शासनाकडे करावी,” अशी मागणी माजी महसूलमंत्री डॉ शालिनीताई पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीरंग सापते, संचालक पोपटराव जगदाळे, कार्यकारी संचालक किसनराव घाडगे, संचालक अक्षय बर्गे, काकासाहेब कदम, शंकर मदने आदी उपस्थित होते.