खळबळजनक! तरूणाने कार्यालयातच गळफास घेत जिवनयात्रा संपविली; १० दिवसांवर होतं लग्न…
चंद्रपूर | गोंडपिपरी नगराच्या मुख्य चौकात असलेल्या महिंद्रा होम फायनन्स कंपनीत रोखपाल म्हणून कार्यरत असलेल्या २८ वर्षीय तरूणाने कार्यालयातच गळफास घेत जिवनयात्रा संपविली. ही घटना उघडकीस येताच एकच खळबळ उडाली आहे. कपिल वराते असं मृतकाचं नाव आहे.
चेकदरूर इथला कपिल वराते हा गोंडपिपरी येथील महिंद्रा होम फायनन्स या कंपनीत रोखपाल म्हणून कार्यरत होता. आज कार्यालयाला सुट्टी असतानाही कंपनीच्या कामानिमित्त वराते त्याचे सहकारी आणि ग्राहक कार्यालयात पोहचले. चर्चा व इतर कामकाज पूर्ण झाल्यानंतर सगळेजण कार्यालयातून निघून गेले. वराते मात्र तिथेच होता.
यानंतर त्याने कार्यालयातच गळफास घेत आपली जिवनयात्रा संपविली. घटनेची माहिती कळताच ठाणेदार जिवन राजगूरू, पीएसआय धर्मराज पटले घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती घेऊन प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. याप्रकरणी पोलीसांनी कार्यालयातील दस्तावेज आणि चावी ताब्यात घेतली आहे. कपिल वराते हा कुटुंबातील कर्ता होता. येत्या १९ एप्रिल रोजी त्याचा विवाह होणार होता. पण त्याआधीच त्याने जिव त्यागला. त्याने हे टोकाचे पाऊल का उचललं? याचा तपास पोलीस करीत आहेत.