“आई-वडील आमदार, खासदार नसूनही मी मंत्री झालो, याचं श्रेय….;” गडकरींनी व्यक्त केली भावना
नवी दिल्ली |
अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच सरकारने पिण्यायोग्य पाणी, आरोग्य, शिक्षण आणि रस्ते यासारख्या मूलभूत सामाजिक कल्याणकारी योजनांचा विचार आणि अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. अन्यथा स्वातंत्र्यापासून या मुलभूत सुविधांचा अभाव होता, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सांगितले. नितीन गडकरी यांनी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त अमेठीमध्ये ७५३ कोटी रुपयांच्या ४७ किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाची पायाभरणी केली. तसेच इतर चार प्रकल्पाचं उद्घाटन केलं. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर टीका करताना गडकरी म्हणाले की, “भाजपा हा परिवारवादी पक्ष नसून कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. केवळ कार्यकर्त्यांमुळेच मी दिवंगत पंतप्रधान वाजपेयी यांच्या शेजारी खुर्ची ठेवून बसू शकलो. नाहीतर आमदार आई-खासदार वडील नसल्याने आणि पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून भिंतींवर पक्षाची पोस्टर रंगवण्याचे, पार्टीसाठी रिक्षांवर लाऊडस्पीकरवर लावण्याचे आणि प्रचाराचे काम करत राहिलो,” असे ते म्हणाले. गडकरींनी केवळ भाजपा कार्यकर्त्यांमुळेच आपल्याला केंद्रीय पद मिळाल्याचं म्हटलं.