अल्लू अर्जुन याची अखेर तुरुंगातून सुटका
कारागृह प्रशासनाला जामिनाची प्रत न मिळाल्याने अल्लू अर्जुनला कालची रात्र कारागृहातच काढावी लागली

तेलंगण : साऊथचा सुपरस्टार आणि ‘पुष्पा 2’ चित्रपटातील नायक अल्लू अर्जुन याची अखेर तुरुंगातून सुटका झाली आहे. तेलंगण हायकोर्टने त्याला 4 आठवड्यांचा अंतरिम जामीन दिला आहे. हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी अल्लू अर्जुन याला अटक करण्यात आली होती. कनिष्ठ न्यायालयाने त्याला 14 दिवसांची कोठडी सुनावली होती, मात्र त्यानंतर त्याला हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत कारागृह प्रशासनाला जामिनाची प्रत न मिळाल्याने अल्लू अर्जुनला कालची रात्र कारागृहातच काढावी लागली. कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशानंतर अल्लू अर्जुनला कडक सुरक्षा व्यवस्थेत चंचलगुडा तुरुंगात पाठवण्यात आले. अखेर आज सकाळी त्याची मुक्तता झाली.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
4 डिसेंबर रोजी ‘पुष्पा 2’ हा चित्रपट रिलीज झाला. तो पाहण्यासाठी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये चाहत्यांनी मोठी गर्दी केली होता. त्यावेळीच अल्लू अर्जुन तेथे येणार असल्याचे समजताच थिएटरबाहेर लोकांनी खूप गर्दी केली. मात्र तो कधी येईल याची कोणतीही माहिती थिएटर व्यवस्थापकांकडून किंवा कलाकारांच्या टीमकडून पोलिसांना देण्यात आली नाही. तसेच गर्दी मॅनेज करण्यासाठी थिएटरच्या व्यवस्थापनाकडून कोणतीही अतिरिक्त तरतूद करण्यात आली नव्हती.कलाकारांच्या येण्याची माहिती असतानाही थिएटर व्यपस्थापनाने त्यांच्यासाठी वेगळा प्रवेश किंवा जाण्यासाठी वेगळा मार्ग केला नव्हता, असे पोलिसांनी नमूद केलं.
रात्री 9.30 च्या सुमारास अल्लू अर्जुन याने थिएटरमध्ये प्रवेश केला, तेव्हा तेथे जमलेल्या सर्व लोकांनीही त्याच्यासोबतच आत येण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी अल्लू अर्जुन याच्या वैयक्तिक सुरक्षा पथकाने लोकांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली, त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली. अल्लू अर्जुनची एक झलक पाहता यावी यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. अल्लू अर्जुन आणि त्याच्या सुरक्षा पथकासह मोठ्या संख्येने लोक खालच्या बाल्कनी परिसरात घुसले. मात्र त्याच गर्दीत हा चित्रपट पाहण्यासाठी आलेली महिला रेवती आणि तिचा मुलगा या दोघांचा जीव घुसमटला. ड्युटीवर तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना कसंबस बाहेर काढलं. त्या लहान मुलावर सीपीआर करत त्यालालगेचच नजीकच्या दुर्गाबाई देशमुख हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्याच्यावर तेथे उपचार करण्यात आले. मात्र त्याची आई, रेवती यांचा घुसमटून मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी संध्या थिएटरचे व्यवस्थापक, अभिनेता अल्लू अर्जुन तसेच त्याची सुरक्षा टीम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणीच काल दुपारी अल्लू अर्जुन याला अटक करण्यात आली होती.