मोदींच्या छळामुळे सुषमा स्वराज-जेटलींचं निधन झाल्याच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल
मुंबई |
निवडणूक आयोगाने द्रमुकचे प्रमुख एम के स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांना नोटीस पाठवली आहे. दिवंगत भाजपा नेते सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्यासंबंधी केलेल्या वक्तव्यावरुन ही नोटीस पाठवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टाकलेला दबाव आणि होणारा छळ सहन न झाल्यानेच त्यांचा मृत्यू झाला असं वक्तव्य उदयनिधी स्टॅलिन यांनी केलं होतं. या वक्तव्यावरुन मोठा गदारोळ झाला होता. निवडणूक आयोगाने स्टॅलिन यांना बुधवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या आधी उत्तर देण्यास सांगितलं आहे.
स्टॅलिन उत्तर देण्यास असमर्थ ठरल्यास कारवाई केली जाईल असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. निवडणूक आयोगाने नोटीसमध्ये दिलेल्या माहितीनुसार, भाजपाने आमच्याकडे २ एप्रिलला तक्रार केली असून उदयनिधी स्टॅलिन यांनी ३१ मार्चला एका रॅलीत संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला छळ आणि दबावामुळे सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचा मृत्यू झाल्याचं वक्तव्य केल्याचं सांगितलं आहे. स्टॅलिन यांनी आचारसंहितेच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं म्हटलं आहे.
उदयनिधी स्टॅलिन काय म्हणाले होते –
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटलं होतं की, “सुषमा स्वराज नावाची एक व्यक्ती होती. मोदींनी टाकलेल्या दबावामुळेच त्यांचा मृत्यू झाला. अरुण जेटली नावाचीही एक व्यक्ती होती. मोदींनी केलेल्या छळामुळेच त्यांचा मृत्यू झाला”. उदयनिधी स्टॅलिन यांनी यावेळी पंतप्रधान पक्षातील वैंकय्या नायडूंसारख्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारत असल्याचं म्हटलं आहे. “तुम्ही सर्वांनाच बाजूला केलं. मिस्टर मोदी, मी ई पलानीस्वामी नाही जो तुम्हाला घाबरेल आणि तुमच्यासमोर झुकेल. मी उदयनिधी स्टॅलिन आहे,” असं यावेळी ते म्हणाले.
वाचा- बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांचे आवाहन