अनिल देशमुख यांच्याबाबत ईडीने केला धक्कादायक दावा; कुंटे यांच्या जबाबावर बोट
मुंबई | मनी लाँडरिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेच कटाचे सूत्रधार आहेत. देशमुख यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला आणि त्यांचा मुलगा हृषीकेश देशमुख , बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे तसेच संजीव पलांडे व कुंदन शिंदे यांच्या मदतीने कट रचून मोठी माया जमवली,’ असा दावा अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात देशमुख यांच्या जामीन अर्जाला विरोध दर्शवताना प्रतिज्ञापत्राद्वारे केला. या अर्जावर शुक्रवारी न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.
‘ अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नेमणुका यातही आपला प्रभाव वापरून नियमबाह्य कृत्ये केली. ते एका कॅबिनेट मंत्र्याच्या मदतीने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांविषयी यादी तयार करायचे आणि ती यादी अनधिकृतपणे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) व पोलीस आस्थापना मंडळात पाठवली जायची. या संदर्भात झालेल्या बैठकांची अधिकृत नोंद नाही आणि अशी अनधिकृत यादी बनवण्याचे मार्गदर्शक तत्त्वांतही नमूद नाही. देशमुख यांनी त्यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या व नेमणुकांसाठी माझ्याकडे अनधिकृत यादी दिली होती, असे तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव ( गृह ) सीताराम कुंटे यांनी त्यांच्या जबाबात नमूद केले आहे, असे ईडीने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
‘ देशमुख हे त्यांच्या ‘ ज्ञानेश्वरी ’ बंगल्यावर बोलावून घ्यायचे आणि बारमालकांकडून खंडणी वसूल करण्यास सांगायचे, ‘त्यांनी शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे लक्ष्य दिले होते,’ असे सचिन वाझेने जबाबात म्हटले आहे. या माध्यमातून देशमुख यांनी चार कोटी ७० लाख रुपये जमवले. या संपूर्ण प्रकरणाचा तपास प्राथमिक टप्प्यात आहे. देशमुख हे अत्यंत प्रभावशाली असल्याने त्यांना जामीन मंजूर केल्यास ते साक्षीपुराव्यांशी छेडछाड करू शकतात. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करू नये,’ असे म्हणणेही ‘ईडी’ने प्रतिज्ञापत्रात मांडले आहे. देशमुख हे २ नोव्हेंबर २०२१ पासून अटकेत असून, सध्या त्यांचा ताबा भ्रष्टाचार प्रकरणाच्या गुन्ह्यात सीबीआयकडे आहे.