वर्षभरात भारतात येणार आर्थिक मंदी, जगभरातील सीईओंनी व्यक्त केली चिंता
नवी दिल्ली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
कोरोनामुळे पुकारलेले लॉकडाऊन आणि रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात भारतात मंदी येऊ शकते, असा निष्कर्ष एका संशोधनातून समोर आला समोर आला आहे. केपीएमजीने भारतातील सीईओ आऊटलूकच्या केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या सर्वेक्षणात जगभरातील १३०० हून अधिक सीईओ सहभागी झाले होते.
या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या भारतातील ६६ टक्के सीईओंनी पुढील १२ महिन्यांत देशात मंदी येण्याची शक्यता वर्तवली आहे. तर, पुढील वर्षभरात जग जागतिक मंदीच्या कचाट्यात येऊ शकते, असं जगभरातील ८६ टक्के सीईओंनी सांगितलं.
जगभरातील अर्थव्यवस्था कोलमडलेली असली तरी आणि देशात आर्थिक मंदी येणार असली तरीही भारतावर याचा फारसा परिणाम होणार नसल्याचंही या सीईओंनी म्हटलं आहे. कारण सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ५८ टक्के सीईओंनी ही मंदी किरकोळ आणि अल्पकालीन असल्याचंही म्हटलं आहे. तर, मंदीसाठी ५५ टक्के कंपन्यांनी तयारीही केल्याचं म्हटलं आहे.
मंदीमुळे काय होईल?
पुढील वर्षभरात जागतिक मंदी येणार असली तरीही या मंदीमुळे कंपन्यांच्या कमाईवर १० टक्क्यांपर्यंत परिणाम होणार आहे. तसंच, विकासावरही परिणाम होण्याची शक्यता असल्याचं ७३ टक्के सीईओंनी म्हटलं आहे. तर, ७६ टक्के सीईओंनी मंदीचा सामना करण्याची तयारी केली असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.