अन्नदात्यांनी अहंकाराला नमवले: राहुल गांधी
नवी दिल्ली |
देशाच्या अन्नदात्यांनी सत्याग्रहाद्वारे अहंकाराला नमवले आहे. त्यामुळे तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा मोदी सरकारचा निर्णय हा अन्यायाविरोधातील विजय आहे आणि आंदोलनात शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्यांचा पराभव आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते राहुल गांधी व्यक्त केली.
जे शेतकरी आंदोलनात सहभागी झाले, परंतु आपल्या घरी परतू शकले नाहीत, त्यांचा हा विजय आहे आणि अन्नदात्यांचा जीव वाचवू न शकलेल्यांचा पराभव आहे, असेही राहुल यांनी ट्वीटर संदेशात म्हटले आहे. या संदेशाबरोबर त्यांनी आंदोलन करतानाची शेतकऱ्यांची छायाचित्रेही प्रसारित केली आहेत. दरम्यान, अनेक काँग्रेस नेत्यांनी राहुल यांचा २९ ऑक्टोबरचा ट्वीट संदेश आणि त्यांच्या भाषणाच्या चित्रफितीही प्रसारित केल्या आहेत. त्यांत, सरकारला कृषी कायदे मागे घेणे भाग पडेल, हे माझे शब्द लक्षात ठेवा, असे त्यांनी म्हटले होते.