दसरा, दिवाळीनंतर राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता; राजेश टोपेंनी दिला धोक्याचा इशारा
मुंबई |
मुंबई: राज्यात आजपासून मंदिरे सुरू करण्यात आली आहे. मात्र, अजूनही कोरोनाचे संकट संपलेले नाही. दसरा, दिवाळीनंतर राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता आहे, असा इशारा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. राजेश टोपे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. दसरा आणि दिवाळी नंतर तिसऱ्या लाटेची शक्यता वाटत आहे. या पार्श्वभूमीवर आपण विशेष लसीकरण करत आहोत. जेणेकरून आरोग्यावर जास्त गंभीर परिणाम होणार नाही, असं टोपे यांनी सांगितलं.
- उद्यापासून ‘मिशन कवच कुंडल’
वर्ष दीड वर्षांपासून सुरू असलेली मंदिरे खुली झाली आहेत. मंदिराबाबतची नियमावली सर्वांनी पाळावी. मंदिरांना देखील सूचना करण्यात आल्या आहेत, असं सांगतानाच उद्यापासून राज्यात मिशन कवच कुंडल सुरू करण्यात येणार आहे. ८ ऑक्टोबरपासून ते १४ ऑक्टोबरपर्यंत हे ‘मिशन कवच कुंडल’ सुरू राहणार आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचं टार्गेट केंद्राने दिले आहे. त्यामुळे लसीकरण मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार असून राज्यात कुठेही लस कमी पडणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात दररोज १५ लाख लसीकरण करण्यात येणार आहे. सध्या आपल्याकडे एक कोटी लसी उपलब्ध आहेत. तसेच यावेळी पहिल्या डोसला आपण प्राधान्य देणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
- मृत्यूदर रोखण्यात यश येईल
मृत्यूदर रोखण्यात आपल्याला यश मिळणार आहे. त्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. काल मी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांना योग्य त्या सूचना दिल्या. या मोहिमेत शासना व्यतिरिक्त आम्ही एनजीओ, सामाजिक संस्था यांना देखील सहभागी करून घेणार आहोत. तसेच सेक्सवर्कर्ससाठी देखील विशेष मोहीम राबविली जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
- त्यांना भरपाई देणार
कोविडमुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या नातेवाईकांच्या खात्यावर ५० हजार रुपयांचं सानुग्रह अनुदान जमा केले जाणार आहे. SDRFच्या निधीतून ही मदत केली जाणार आहे. एक लाख ४० हजार लोकांचा मृत्यू कोव्हीडमुळे झाला आहे. त्यांना प्रत्येकी ५० हजार दिले जाणार आहेत. कोरोनामुळे १ लाख ४० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यासाठी ५० हजाराप्रमाणे ७०० कोटी रुपये लागणार आहेत. वारसांच्या खात्यात ही रक्कम केली जाणार आहे. वेब पोर्टल बनवून त्यावर या सूचना दिल्या जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. म्युकरमायकोसिसमुळे दगावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनाही सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
- कारवाईत काही तथ्य असेल वाटत नाही
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कंपन्यांवर धाडी टाकण्यात आल्या. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. दादा चांगलं काम करतात. अजितदादा अशा पद्धतीच्या कारवाईला कायदेशीर मार्गाने समोर जात असतात, यात काही तथ्य असेल असं मला वाटत नाही, असं त्यांनी सांगितलं.