हुबळी ते मुंबई बस प्रवासादरम्यान प्रवाशाचा 2 लाख 25 हजारांचा ऐवज लंपास
पिंपरी l प्रतिनिधी
हुबळी ते मुंबई असा बस प्रवास करत असलेल्या एका प्रवाशाचा दोन लाख 25 हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 2) रात्री आठ ते रविवारी (दि. 3) सकाळी पावणे सहा वाजताच्या कालावधीत घडली.
भावेश मुलचंद राठोड (वय 38, रा. केशवापूर, ता. हुबळी, जि. धारवाड) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे खाजगी बसने हुबळी ते मुंबई दरम्यान प्रवास करत होते. ते रविवारी सकाळी पावणे सहा वाजता उर्से टोलनाका येथे आले असता त्यांच्या लक्षात आले कि, त्यांची बॅग चोरीला गेली आहे. त्यात फिर्यादी यांचे रोख रक्कम, 90 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, मोबाईल फोन असा एकूण दोन लाख 25 हजार रुपयांचा ऐवज होता.
वाकड येथुने एक व्यक्ती त्यांच्या बसमध्ये बसला होता. तो उर्से टोल नाका येथून गायब झाला. त्याच्यावर फिर्यादी यांचा संशय आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.