आळंदीत सुसज्ज दर्शनबारी नसल्याने भाविकांची दर्शनासाठी रस्त्यावर रांग; दर्शनमंडप आणि अर्धवट स्कायवॉककडे प्रशासनाचे दुर्लक्ष
आळंदी | महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थक्षेत्र श्रीक्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून अनेक भाविक येत असतात. तसेच कार्तिकी, आषाढी आणि महिन्याच्या एकादशीला आळंदीत यात्रेचे स्वरूप निर्माण होत असते.या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या दर्शनासाठी सुसज्ज अशी दर्शनबारीची गरज असताना प्रशासनाने नदीपलीकडील जागेवर दर्शन मंडपाचे आरक्षण टाकले होते. परंतु स्थानिक प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने अहवाल सादर केल्याने येथील दर्शन मंडपाचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे.ऊन, वारा, पाऊस यापासून भाविकांचे संरक्षण व्हावे यासाठी दर्शनमंडपाची नितांत गरज आहे. तसेच इंद्रायणी नदीवर दर्शनमंडपाच्या अनुषंगानेच स्कायवॉकची निर्मिती करण्यात आली होती. परंतु सध्या दोन-तीन वर्ष झाले, या स्कायवाकचे काम अर्धवट अवस्थेत असून तेसुद्धा पूर्ण करण्यात यावे अशी मागणी आळंदीकर ग्रामस्थ आणि वारकरी प्रतिनिधींनी पुणे जिल्हाधिकारी यांना केली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज मंदीराशेजारील दर्शनबारी फक्त बाराशे ते पंधराशे भाविकांची मर्यादित असल्याने इतर भाविकांना दर्शनबारीच्या बाहेरच रांग लावावी लागत आहे. तरी भाविकांचा विचार करून दर्शनमंडपाची नितांत गरज आहे.
तरी या सर्व प्रकाराची आपल्या पातळीवर चौकशी करून पूर्वनियोजित जागेवर दर्शन मंडप आरक्षण सुनिश्चित करण्यात यावे आणि इंद्रायणी नदीवरील बांधण्यात आलेल्या स्कायवाकचे अर्धवट अवस्थेतील काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी आळंदीकर ग्रामस्थांच्यावतीने ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, माजी विरोधी पक्षनेते डी.डि.भोसले पाटील, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, संदीप नाईकरे, महेश कुऱ्हाडे, प्रसाद बोराटे, मनोज कुऱ्हाडे, किरण नरके, ज्ञानेश्वर शेटे यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना केली आहे.