लाचारी दाखवू नका, पंकजा मुंडेंनी स्वत:चा पक्ष काढावा: इम्तियाज जलील
औरंगाबाद: भाजपने पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा हुलकावणी देत विधानपरिषदेच्या निवडणुकीत डावललं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे या पंक्षातर्गत गटबाजीने नाराज असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पंकजा मुंडेंना सल्ला देत त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन करावा, असं म्हटलं आहे. तसेच, गरज पडल्यास मी पाठिंबा देईल असंही ते म्हणाले.
भाजपने पंकजा मुंडे यांना राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी दिली नाही. त्यामुळे पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच, राज्यात मोठ्या प्रमाणात पंकजा समर्थकांमध्येही भाजपविरोधात नाराजी पाहायला मिळत आहे. मात्र, पंकजा मुंडे यांनी अद्याप यावर काहीही भाष्य केलेलं नाही. आता इम्तियाज जलील यांनी पंकजा मुंडेंना स्वत:चा पक्ष स्थापन करण्याचा सल्ला दिला आहे. ते ‘टीव्ही-९ मराठी’शी बोलत होते.
इतकी लाचारी का दाखवायची – इम्तियाज जलील
“हा माझा एक सल्ला आहे. पंकजा मुंडेंना चांगलं भविष्य आहे. कारण त्यांच्या नावापुढे गोपीनाथ मुंडेंचं नाव आहे. गोपीनाथ मुंडेंना माणणारा एक मोठा वर्ग आहे. जेव्हा ते राज्याचे गृहमंत्री होते तेव्हा त्यांनी वंजारी समाजासाठी जे काम केलं ते कोणीही विसरलेलं नाही. मग, पंकजा मुंडेंना का आशा नाही. इतकी लाचारी का दाखवायची, विधानपरिषदेची उमेदवारी दिली नाही म्हणून फक्त नाराजगी दाखवायची. त्यांनी दुसऱ्याच दिवशी पक्षाला रामराम ठोकायचा होता”, असं जलील म्हणाले.
तर महाराष्ट्रात भूकंप येणार – इम्तियाज जलील
“जेव्हा तुम्ही ओबीसीच्या नेत्या म्हणून उभ्या राहाल तेव्हा तुमच्या मागे किती मोठी ताकद उभी राहील हे तुम्हाला पाहायला मिळेल. मी स्वत: पंकजाना एक-दोन वेळा हे बोललो आहे, खासदार प्रीतम मुंडेंनाही मी हे सुचवलं होतं. मला असं वाटतं की त्यांनी हा निर्णय घेतला तर महाराष्ट्रात भूकंप येऊ शकतो आणि मग मुंडे कुटुंबाची ताकद महाराष्ट्रात काय आहे हे सर्वांना कळेल”.
मुस्लिम आणि ओबीसी एकत्र आले तर ते काहीही करु शकतात- इम्तियाज जलील
“आमच्यासाठी राजकीय दृष्ट्या ओबीसी समाजासोबत जाणं अत्यंत फायदेशीर असेल. जर राज्यात मुस्लिम आणि ओबीसी एकत्र आले तर ते काहीही करु शकतात”, असंही इम्तियाज जलील म्हणाले.