‘राजेश टोपे गांजा ओढून पत्रकार परिषद घेतात का?’, गोपीचंद पडळकर यांची टीका
सांगली – राजेश टोपे यांनी सकाळी जी पत्रकार परिषद घेतली ती गांजा ओढून घेतली होती का? असा बोचरा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. येत्या 1 मेपासून राज्यभरात कोरोना प्रतिंबधात्मक लसीकरण मोहीम राबवण्यात येईल, असे राज्य सरकारने यापूर्वी सांगितले होते. मात्र, काल (28 एप्रिल) पत्रकारांशी बोलताना 1 मे पासून पुरेशा लसींअभावी लसीकरणाची मोहीम राबवता येणार नाही असे राजेश टोपे असे सांगितले होते. त्यानंतर हाच मुद्दा घेऊन पडळकर यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.
गोपीचंद पडळकर काय म्हणाले ?
“काल सकाळी राज्याच्या पालकमंत्र्यांनी घोषित केलं की एक तारखेपासून आम्ही 18 ते 45 वयोगटातील लोकांचे आम्ही लसीकरण करणार आहोत. नंतर 4 वाजता सांगितलं की ते करता येणार नाही. म्हणजे हे लोक पुरते गोंधळलेले आहेत. सकाळी जी प्रेस घेतली होती, ती गांजा ओढून घेतली होती का ? यांना उठ सूट केंद्राकडे बोट दाखवायचं आहे. यांना केंद्राकडे बोट दाखवायचं आहे. मुळात विचारसरणी एक नसताना, कोणताही अजेंडा नसताना ते एकत्र आले आहेत,” असे गोपीचंद पडळकर म्हणाले.
हे भाजपला विरोध करण्यासाठी एकत्र आले
यावेळी पुढे बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांवर सडकून टीका केली. भाजपचं राजकीय प्रस्थ समाप्त करण्यासाठी हे पक्ष एकत्र आल्याचा आरोप पडळकर यांनी केला. “कोणतीही विचारधारा तसेच अजेंडा नसताना हे तिन्हा पक्ष एकत्र आले आहेत. भारतीय जनता पार्टीची जिरवण्यासाठी ते एकत्र आले आहेत. मात्र, भाजपचं काम चांगलं असल्यामुळे त्यांना ते जमलं नाही. यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेचं जिरवण्याचं काम मात्र या सरकारने केलं आहे,” असा टोला पडळकर यांनी गलावला. तसेच पुढे बोलताना त्यांनी राज्य सरकारने या सर्वांमधून बाहेर येऊन महाराष्ट्रात कोणाचीही मृत्यू होऊ नये त्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.
राज्याला मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणार नाही. त्यामुळे 1 मे पासून राज्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं मोफत लसीकरण सुरू होणार नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 28 एप्रिल रोजी स्पष्ट केलं.काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. राज्यात सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र लगेच मोठ्या प्रमाणावर लस मिळणार नसल्याने राज्यात 1 मे रोजी लसीकरण करण्यात येणार नाही. मे अखेरीपर्यंत व्हॅक्सीन मिळाली तर लसीकरण करता येईल, असं सांगतानाच लसीकरणासाठी वयोगटाचे टप्पे करण्याचा विचार सुरू आहे. त्यानुषंगाने प्रत्येकाला लस मिळेल. तसेच येत्या सहा महिन्यात हे लसीकरण पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे, असं टोपे यांनी सांगितलं.