नळ कनेक्शन वरून दोन गटात वाद ; परस्पर विरोधात गुन्हे दाखल
पिंपरी l प्रतिनिधी
नळ कनेक्शन घेण्यावरून च-होली येथे दोन गटात वाद झाला. याबाबत दोन्ही गटांनी परस्पर विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना रविवारी (दि. 13) रात्री घडली.
एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार हरिभाऊ महादू थोरवे, भाडेकरू (पूर्ण नाव माहिती नाही), संदीप हरिभाऊ थोरवे, समीर हरिभाऊ थोरवे, समीर दळवी, सोमनाथ दत्तात्रय थोरवे, स्वप्नील ज्ञानेश्वर थोरवे, श्रेयस संदीप थोरवे, स्वराज संदीप थोरवे, कार्तिक अशोक थोरवे आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराजवळून बेकायदेशीर नळ कनेक्शन घेऊ नका, असे फिर्यादी यांनी म्हटले असता आरोपींनी त्यांना दगड, विटा, फरशीचे तुकडे फेकून मारून जखमी केले. तसेच फिर्यादी यांच्या दिराला डोक्यात मारून जखमी केले. फिर्यादी यांच्या घरावर, दुचाकी, कारवर दगडफेक करून नुसकान केले आहे.
याच्या परस्पर विरोधात एका महिलेने फिर्यादी दिली असून त्यानुसार दत्तात्रय प्रभाकर नलावडे (वय 50, रा. च-होली), पाच महिला आणि इतर तीन ते चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्या घराजवळून नळ कनेक्शन करायचे नाही असे म्हणत फिर्यादी यांच्या मुलाला सिमेंटच्या विटेने मारून जखमी केले. फिर्यादी यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास दिघी पोलीस करीत आहेत.